Chakan : राज्यकर्त्यांना घरी बसवण्यासाठी राष्ट्रवादीला सहकार्य करा -अजित पवार

चाकणमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा; लोकांचे लक्ष विचलित करण्याचा सरकारचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – देशात अस्थिरता निर्माण करणाऱ्या शासनकर्त्यांना घरी बसविण्यासाठी आणि शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी शिरूरमधील मतदारांनी राष्ट्रवादीला सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रवेशानंतर त्यांच्या स्वागत मेळावा चाकण (ता. खेड) येथे बुधवारी (दि.६) झाला. यावेळी ते बोलत होते.

  • यावेळी आ. दिलीप वळसे-पाटील, डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार दिलीप मोहिते, अॅड. राम कांडगे, विलास लांडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, कैलास सांडभोर, राहुल नायकवाडी, सरफराज सिकीलकर, विजय खाडे, दतात्रेय बिरदवडे, डॉ.विजय गोकुळे, राम गोरे, विकास नायकवाडी आदींसह सर्व पदाधिकारी आणि तालुक्यातून मोठ्या संखेने आलेले नागरिक आदी उपस्थित होते.

यावेळी पवार म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदी केली, त्यानंतर काळा पैसा किती आला? कुणाचा आला? कसलीही आकडेवारी दिली नाही. देशात सर्वच आघाड्यांवर सरकार अपयशी ठरलेले असताना लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत आहे. सुमारे ५०० कोटी रुपयांचे राफेलचे विमान सोळाशे कोटी रुपयांना मोदींनी का घेतले? पुलवामा येथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्फोटके आलीच कशी? अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी सरकारला घेरले.

  • त्यानंतर डॉ.कोल्हे यावेळी म्हणाले, देशात सर्वत्र अस्वस्थतेचे वातावरण आहे. महागाई, बेरोजगारी, मनुवादाचे स्तोम माजविले जात आहे. जातीपातीच्या राजकारणात सर्वांना विभागले जात आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण?, कसा असणार? यापेक्षा प्रत्येकाने स्वतः उमेदवार आहोत, असे मानले पाहिजे. शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही करीत परिवर्तन घडविण्याची साद उपस्थितांना घातली.

दिलीप वळसे, दिलीप मोहिते, विलास लांडे यांनी नेहमीच्या शैलीत शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यावर शेलक्या शब्दात टीका करून विमानतळ, आणि अनेक विकास प्रकल्प घालविण्यास आढळराव जबाबदार असल्याचा आरोप केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.