Pimpri : पवार कुटुंबीयांचे नाव घेतल्याशिवाय ‘चंपा’ यांना दिवसही जात नाही – अजित पवार

एमपीसी न्यूज – पवार कुटुंबातील व्यक्ती आता भाजपमध्ये येतील असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा अजित पवार यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. ‘चंपा’ म्हणतात त्याला काही अर्थ नाही. पवार कुटुंबीयांचे नाव घेतल्याशिवाय त्यांना दिवस जात नसल्याची टीका त्यांनी केली.

पिंपरी-चिंचवड शहरातील उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह पार्थ पवार कधी येणार की येणार नाहीत, असे विचारले असता अजित पवार म्हणाले, ते सर्व महाराष्ट्रातील विविध भागातील उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी फिरत असून ‘मीच येणार आहे इकडे’ असे ‌उत्तर त्यांनी आपल्या स्टाईलने दिले.

शिरूर लोकसभा मतदारसंघात भोसरी विधानसभा हा भाग येतो. त्यामुळे खासदार कोल्हे तेथे येतीलच पण ‘पिंपरी आणि चिंचवडमधील उमेदवाराच्या प्रचारासाठी तुम्ही यावे, अशी विनंती मी त्यांनी करणार आहे. ते माझी विनंती मान्य करतील’, असेही ते म्हणाले.

पवना जलवाहिनी होणार नाही तर स्पष्ट सांगा पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांची पाण्याची गरज भागविण्यासाठी पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाचे काम मार्गी लावणे गरजेचे आहे. गेल्या पाच वर्षात राज्यासह केंद्रापर्यंत सत्ता असताही भाजप सरकारला हा प्रश्न निकाली काढण्यात यश आलेले नाही, ही मोठी दुर्दैवी बाब आहे.

केवळ आश्वासने देत नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. हा प्रकल्प होणार नसेल तर फसवणूक न करता तसे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी जाहीर करावे, अशी मागणी पवार यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.