Pune News : उद्धव ठाकरे सर्वात चांगले पाचवे मुख्यमंत्री कसे ठरतात? हाच मोठा प्रश्न – चंद्रकांत पाटील
एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या टॉप पाच मुख्यमंत्र्याच्या यादीत स्थान मिळवले आहे. इंडिया टुडे माध्यम समुहातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता कायम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मात्र, यावरून उद्धव ठाकरे पाचवे सर्वात चांगले मुख्यमंत्री कसे ठरतात? हाच मोठा प्रश्न आहे. असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारपणामुळे सार्वजनिक कार्य़क्रमांना हजर राहत नसले तरी, त्यांची लोकप्रियता कायम असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र फक्त मुंबईच आहे,’ अशी टीका केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत आपलं मत मांडलं आहे. ‘मुख्यमंत्री नावाच्या खुर्चीकडून जनतेला फार अपेक्षा आहे. गेल्या 2 वर्षांमध्ये मुख्यमंत्री एकदाही मंत्रालयात आले नाहीत. गेले 80-90 दिवस ते लोकांसाठी उपलब्धच नाहीत. ते देशातील पाचवे सर्वात चांगले मुख्यमंत्री कसे ठरतात? हाच मोठा प्रश्न आहे. पंतप्रधानांच्या बैठकीला ते ऑनलाइन उपलब्ध नसतात आणि मुंबई मनपाच्या सर्व कार्यक्रमांना उपलब्ध असतात. त्यांचा महाराष्ट्र फक्त मुंबईच आहे, असं वाटू लागलंय !’ असं चंद्रकांत पाटील यांनी ट्विट यांनी ट्विट केले आहे.
दरम्यान, इंडिया टुडेच्या या सर्वेक्षणात ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत. या यादीत पाचवा क्रमांक उद्धव ठाकरे यांचा आहे तर, पाचव्या स्थानावर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आहेत.