Chikhali : मुलाने दुसरे लग्न केल्याच्या रागातून वडिलांचे अपहरण
एमपीसी न्यूज – मुलाने दुसरे लग्न केल्याच्या रागातून पहिल्या पत्नीच्या माहेरच्या लोकांनी मुलाच्या वडिलांना शिवीगाळ करीत त्यांचे जबरदस्तीने अपहरण केले. ही घटना सोमवारी (दि. 23) पहाटे दीडच्या सुमारास चिखली येथे घडली.
प्रभू सर्जेराव मदने (वय 60, रा. म्हेत्रेवस्ती, चिखली) असे जबरदस्तीने पळवून नेलेल्या वडिलांचे नाव आहे. या प्रकरणी दत्तात्रय प्रभू मदने (वय 30) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कल्याण संभाजी बिडगर (रा. कात्रज) आणि त्याचे तीन साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्तात्रय यांचा मोठा भाऊ बापू मदने याने दुसरे लग्न केले. या कारणावरून बापू मदने याच्या पहिल्या बायकोचा भाऊ कल्याण आणि त्याचे तीन साथीदार यांनी फिर्यादी दत्तात्रय यांचे वडील प्रभू मदने यांना शिवीगाळ केली. तसेच जबरदस्तीने एका मोपेड दुचाकीवर प्रभू यांना बसवून चिंचेचा मळा, चिखलीकडे घेऊन गेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिखली पोलीस तपास करीत आहेत.