Chikhali News : गडकोटांचे पर्यावरण राखणे ही सामूहिक जबाबदारी : राहुल श्रीवास्तव

एमपीसीन्यूज : शिवरायांचे गडकिल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. गडांचे जतन, संवर्धन, स्वच्छता व पर्यावरण राखणे, ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पर्यावरण कार्यकर्ते राहुल श्रीवास्तव यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.

चिखली, मोरेवस्ती येथील शब्दब्रम्ह विविधांगी सेवा संस्था, योगेश्वर केदारनाथ सर्वधर्मसमभाव शिवमंदिर व सुरेश कृष्णा जाधव स्मृती वाचनालयाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण श्रीवास्तव यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी कीर्तनकार प्रवीण दाऊतपुरे होते. या वेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे काठोळे गुरुजी, संस्थेचे संस्थापक प्रभाकर चव्हाण, योगशिक्षक दत्तात्रय महापुरे, सामाजिक कार्यकर्ते राहुल वाघमारे, उद्धव साळवे आदी उपस्थित होते.

वक्तृत्व स्पर्धेत अथर्व तुपे प्रथम

वक्तृत्व स्पर्धेत अथर्व गणेश तुपे याने प्रथम, तर हरिओम बिरादार याने द्वितीय क्रमांक पटकावला. मोनिका बिरादार, ओंकार बोरकर, संजय नवगिरे, गौरी माने, आनंद बिरादार यांना प्रोत्साहनार्थ पारितोषिक देण्यात आले. या वेळी मुलांनी पोवाडे, कविता सादर करीत वातावरण भारावून टाकले.

कापडी पिशव्यांचे वाटप

दरम्यान, प्लॅस्टिकला फाटा देण्याचा संकल्पही कार्यक्रमात करण्यात आला. तसेच श्रीवास्तव यांच्या पुढाकारातून उपस्थितांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

संस्थेच्या सविता बोरकर, मेघना आंब्रे, स्मिता जाधव, वैशाली कुंजीर, गाथा चव्हाण यांनी संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.