Chikhali News : शेतकरी पुत्र असलेल्या रावसाहेब दानवे यांना शेतकऱ्यांच्या दुःखाची जाण नाही – सुलभा उबाळे

एमपीसीन्यूज : शेतकरी पुत्र असलेल्या व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना शेतकऱ्यांचे दुःख समजत नाही, हे मोठे दुर्दैव आहे. दिल्लीजवळ सुरु असलेलया आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे बेताल वक्तव्य करुन दानवे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. त्यांना देशभरातील शेतकरी कधीही माफ करणार नाहीत, अशा  शब्दांत शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी केंद्रीय मंत्री दानवे यांच्यावर हल्लाबोल केला.

केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा कायद्याविरोधात हरियाणा आणि दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला शिवसेना भोसरी विधानसभेचा वतीने जोडे मारून जाहीर निषेध करण्यात आला.

चिखली येथील साने चौकात आज, शनिवारी साडे सकाळी अकराच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, उपशहरप्रमुख अनिल सोमवंशी, युवासेना जिल्हाधिकारी सुरज लांडगे, सचिन सानप, समन्वयक अंकुश जगदाळे, दादा नरळे, सर्जेराव भोसले, विभाग प्रमुख सतीश दिसले, गणेश इंगवले, सतीश मरळ,उपविभागप्रमुख नितीन बोंडे यांच्यासह शिवसैनिकांनी या आंदोलनात सहभाग घेतले.

सुलभा उबाळे पुढे म्हणाल्या, रावसाहेब दानवे यांच्याप्रमाणे सतत बेताल वक्तव्ये करणारे भाजप नेते हे मोदी लाट आणि संघाच्या ताकदीवर निवडून आलेली आहेत. त्यांचे स्वतःचे कर्तृत्व शून्य आहे. या मंडळींना शेतकऱ्यांचे प्रश्न समजत नाहीत. समाजभान नसलेल्या दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी मत व्यक्त करावे एवढीही त्यांची पात्रता नाही, अशी टीकाही उबाळे यांनी केली.

निलेश मुटके, धनंजय आल्हाट, सुरज लांडगे, सचिन सानप यांनी दानवे यांच्या शेतकरीविरोधी वक्तव्याचातीव्र शब्दात निषेध नोंदवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.