Chinchwad crime News : मूळ सायलेन्सरमध्ये बदल करणाऱ्या अडीच हजार बुलेटस्वारांवर कारवाई

25 लाखांहून अधिक दंड

एमपीसी न्यूज – दुचाकीचे मूळ सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजाचा सायलेन्सर बसविण्याचे प्रमाण शहरात वाढत आहे. याचा नाहक मनस्ताप सर्वसामान्य नागरिकांना होतो. त्यामुळे अशा दुचाकीस्वारांवर पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. ऑक्टोबर 2020 पासून सुमारे अडीच हजार दुचाकी स्वारांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्यात पोलिसांनी तब्बल 25 लाखांहून अधिक रुपयांचा दंड आकारला आहे.

बुलेटचा सायलेन्सर बदलून मोठमोठ्याने आवाज करीत जाणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिले. याशिवाय फॅन्सी नंबर प्लेट व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते.

त्यानंतर वाहतूक पोलिसांनी 18 ऑक्‍टोबर 2020 पासून बुलेटचा सायलेन्सर बदलणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली.

आरटीओच्या परवानगीशिवाय वाहनात कोणताही बदल केल्यास त्या वाहनचालकाला एक हजार रुपये दंड केला जातो. तसेच फॅन्सी नंबर प्लेट, प्रखर दिवे किंवा प्रेशर हॉर्न बसवणाऱ्या वाहन चालकांवरही कारवाई केली जाते.

वाहतूक पोलिसांनी 18 ऑक्‍टोबर पासून बुलेटचा मूळ सायलेन्सर बदलणाऱ्या अडीच हजाराहून अधिक जणांवर कारवाई केली आहे.

कारवाई केलेल्या बुलेटस्वारांना 25 लाख रुपयाहून अधिक रकमेचा दंड पोलिसांकडून ठोठावण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनी कारवाई करीत शहरातून तब्बल 150 भंगारातील रिक्षा जप्त केल्या आहे. आता या रिक्षांची देखील विल्हेवाट लावण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.