Chinchwad : पाच सदस्यीय विशेष पथक करणार संवेदनशील गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ दोनच्या हद्दीमध्ये गुन्हेगारी वाढू लागली आहे. तसेच अनेक संवेदनशील गुन्ह्यांचा अद्याप उलगडा झाला नाही. या गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी एका विशेष पथकाची स्थापना केली आहे.

परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, महिला उपनिरीक्षक एस. डब्ल्यू. वाघमारे यांच्यासह अन्य तीन कर्मचारी या पथकामध्ये सहभागी असणार आहेत. आयुक्तालयातील परिमंडळ दोनमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. तसेच अनेक संवेदनशील गुन्हे उघड झाले नाहीत. मोठ्या प्रमाणात अर्ज देखील प्रलंबित आहेत. या सर्व बाबी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी हे विशेष पथक स्थापन केले आहे. हे पथक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. या पथकाने दररोज केलेल्या कार्यवाहीचा अहवाल थेट आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे परिमंडळ दोनवर आता इथून पुढे थेट पोलीस आयुक्तांचाच वॉच राहणार आहे.

परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील म्हणाल्या, “प्रलंबित अर्ज तसेच संवेदनशील गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी या पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार परिमंडळ दोनच्या हद्दीमध्ये येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्यांतील महत्वाचे अर्ज आणि संवेदनशील गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करणार आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.