Chinchwad : गझलपुष्प पिंपरी-चिंचवडतर्फे आयोजित गझलरजनी उत्साहात

एमपीसी न्यूज – गझलपुष्प पिंपरी-चिंचवडच्या वतीने आयोजित गझलरजनी उत्साहात पार पडली. पैस रंगमंच चिंचवड येथे शनिवारी रात्री 10:30 वा गझल रजनीस प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या आरंभी ज्येष्ठ उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि रोटरी क्लब, चिंचवडचे अध्यक्ष बाळकृष्ण खंडागळे यांच्या हस्ते शमा प्रज्वलित करण्यात आली. प्रास्ताविक करत असताना दिनेश भोसले यांनी सार्वकालिक महान उर्दू गझलकार मिर्झा गालिब आणि गझलसम्राट सुरेश भट यांच्या गझल वाचनाने प्रारंभ केल्यानंतर खऱ्या अर्थाने मैफिलीस प्रारंभ झाला.

एक से बढकर एक दिग्गजांनी आपल्या बहारदार रचना तहत, तरन्नुममध्ये सादर केल्या. सुंदर आवाज, दमदार सादरीकरण व गझलियतभरे, रवायती, गंभीर, हसऱ्या, विचार करायला लावणाऱ्या, अगदी गझलेच्या मोहमयी सागरात मनसोक्त डुंबायला लावणाऱ्या कधी खोल खोल तळाला तर कधी उंचच उंच नभामध्ये मुक्तविहार करून मनसोक्त आनंद देणाऱ्या रचना मन भावून गेल्या. गझलेचे विविध रंग उधळले गेले. मराठी गझल प्रांतातला हा महाराष्ट्रातील पहिला आणि अनोखा प्रयोग सुरळीत पार पडला.

गझल रजनी हा रात्रभर चालणारा अनौपचारीक गझलसादरीकरणाचा आगळावेगळा उपक्रम राबविला आणि जवळपास ४० गझलकारांच्य‍ा उपस्थितीत व त्यांच्या उत्कृष्ट गझलांच्या सादरीकरणाने तो यशस्वीही झाला. संपूर्ण रात्रभर गझलमय वातावरणाने सर्वजण भारून गेले होते.

ज्येष्ठ गझलकार प्रमोद दादा खराडे(पुणे), आनंद पेंढारकर (मुंबई), यांच्यासह संवेदना प्रकाशनचे प्रकाशक नितिनजी हिरवे, प्रसिद्ध व्याख्याते राजेंद्रजी घावटे, तसेच गझलकारा उर्मिलाजी बांदिवडेकर (मुंबई), व डॉ. शरयूजी शहा (मुंबई), अशा जेष्ठांच्या तसेच सिद्धार्थ वाघमारे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. सुनिती लिमये, मृणाल घाटे, कविता काळे या गोड गळ्यांनी तरन्नूममध्ये रंग भरला.

तसेच गझल मंथन समुहाचे संचालक अनिल कांबळे, (पनवेल). समरसता पिंपरी चिंचवड चे कैलास भैरट, स्वाती यादव (पुणे), अभिजीत दाते(मुंबई), जयंत कुळकर्णी (डोंबिवली), डॉ. जितेन्द्र पेंढारकर (मुंबई) उर्मिला वाणी (पुणे), वर्षा कुलकर्णी (पुणे), योगेश वैद्य(चेंबूर), हेमंत राजाराम (डोंबिवली), रुपेंद्र कदम (सांगली) मोहन गोखले, डॉ. रेखा देशमुख (पुणे), प्रकाश बनसोडे, जीवन धेंडे (बार्शी), नवनाथ खरात (करमाळा),विशाल राजगुरू, (मुंबई), संदीप मर्ढेकर(डोंबिवली) सर्वांनीच एकाहून एक दर्जेदार गझला सादर केल्या.

कार्यक्रमादरम्यान गझल सादरीकरणाच्या चार फेर्‍या झाल्या. पहाटे 5:00 वाजेपर्यंत मैफिल रंगली. परिपूर्ण कार्यक्रम, उत्तम नियोजन आणि वेळेचं बंधन पाळण्याबाबत आणि एक अतिशय दर्जेदार कार्यक्रम यशस्वी पद्धतीने आयोजित केल्याबद्दल पुन्हा एकदा महाराष्ट्रभरातून गझलपुष्पवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

इथून पुढे दरवर्षी गझल रजनी आयोजित होणार असल्याचे गझलपुष्प समुहाच्या वतीने दिनेश भोसले यांनी घोषित केले. तर आयोजनामध्ये अभिजीत काळे, प्रशांत पोरे, संदीप जाधव, तुकाराम पाटील, रघुनाथ पाटील, नंदकुमार मुरडे, महेश खुडे, बी एस बनसोडे, मीना शिंदे यांनी सहभाग नोंदवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.