Chinchwad News: लोकसभा निवडणुकीत कोणाचा प्रचार करायचा, हे ‘राम भरोसे’! – शिवाजीराव आढळराव

एमपीसी न्यूज – महाविकास आघाडी झाली असली. तरी, पुणे जिल्ह्यात आपली खरी लढाई राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच आहे. जिल्ह्यात आपले सरकार नाही. राज्यात आपले सरकार आहे. या भ्रमात राहू नका, संघर्ष आपल्या पाचवीलाच पुजला आहे. पुढच्या लोकसभा निवडणुकीत मला कोणाचा प्रचार करावा लागतोय, हे माहीत नाही. मी देखील ‘राम भरोसे’ आहे, अशी खदखद शिवसेनेचे शिरूरचे माजी खासदार आणि उपनेते शिवाजीराव अढळराव यांनी व्यक्त केली.

‘मिशन 2022’ अंतर्गत भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा आज (शनिवारी) शाहुनगर येथे मेळावा झाला. शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर,  संपर्कप्रमुख बाळा कदम, शहरप्रमुख योगेश बाबर,  खेडचे सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद, उपजिल्हाप्रमुख नीलेश मुटके, शिवसेना महिला आघाडीच्या शिरूरच्या जिल्हासंघटक सुलभा उबाळे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

शिवाजीराव आढळराव म्हणाले, महापालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत आपल्याला अपयश आले होते हे विसरून चालणार नाही. आगामी निवडणूक 8 ते 9 महिन्यांवर आली आहे. आता स्वस्थ बसून चालणार नाही. त्वेषाने लढले पाहिजे. भोसरीत शिवसेनेचे वर्चस्व स्थापन करावे. निवडणुकीत आपण कमी पडतो. सर्वांना वाटत आहे की, आपला संघर्ष हा आता फक्त भाजपशी आहे. मात्र, तसे नाही. आपला संघर्ष भाजपशी नसून राष्ट्रवादीबरोबर आहे. पुणे जिल्ह्यात आपले सरकार नाही. आपल्या पाचवीला संघर्ष पुजलेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.