Chinchwad News : स्थानिक लोकप्रतिनिधींनी लघुउद्योजकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत – डॉ. अमोल कोल्हे
एमपीसी न्यूज -लघु उद्योजकांचे अनेक प्रश्न आहेत आणि ते ब-याच दिवसांपासून प्रलंबित आहेत. यापैकी काही प्रश्न पालिका स्तरावरील, काही राज्य तर काही केंद्र पातळीवरील आहेत. राजकारण बाजूला ठेऊन स्थानिक लोकप्रतिनिधींनी लघुउद्योजकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. तसेच आपल्या समस्या मार्गी लावण्यासाठी उद्योजकांनी अधिकाराने लोकप्रतिनिधीना भेटून त्याचा पाठपुरावा केला पाहिजे, असे मत शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (शनिवारी, दि. 06) चिंचवड येथे व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेच्या वतीने केंद्रिय अर्थसंकल्प व औद्योगिक समस्ंयाबाबत आयोजित परिसंवादात खासदार कोल्हे बोलत होते. यावेळी माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर मंगला कदम, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदिप बेलसरे, सचिव जयंत कड व इतर मान्यवर उपस्थित होते.
खासदार कोल्हे पुढे म्हणाले, लघुउद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक प्रशासनाची इच्छा असू नये ही खेदाची बाब आहे. लघु उद्योजकांचे अनेक प्रश्न आहेत आणि याकडे माणूस म्हणून बघायला पाहिजे. इच्छाशक्ती असेल तर अनेक समस्या सुटू शकतात.
लघुउद्योजकांनी मांडलेल्या प्रश्नांवर बोलताना कोल्हे म्हणाले, राज्य आणि केंद्र पातळीवर प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
विमानतळाबाबत आपल्याकडे अनेक संधी आल्या पण त्याचं सोनं करता आलं नाही. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत आपण यासाठी प्रयत्न करू, असा विश्वास कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केला.
चाकण, वाघोली हा भाग मल्टी मॉडेल हब व्हावा यासाठी देखील प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केलं. लघुउद्योजकांचे प्रश्न महत्वाचे आहेत. यामध्ये राजकारण न आणता ते सोडवले पाहिजेत, आणि राजकीय बोलायचं झाल्यास ‘पालिकेत सत्ता द्या प्रश्न सोडवतो’ असे मिश्किलपणे कोल्हे आपल्या म्हणाले.