Chinchwad news: …अन एका ‘बादली’मुळे झाला महिनाभर पाणी पुरवठा विस्कळीत!

एमपीसी न्यूज – ऐन उन्हाळ्यात चिंचवड, बिजलीनगर येथील पाणीपुरवठा एका ‘बादली’मुळे विस्कळीत झाला होता. जलवाहिनीमध्ये तब्बल 20 किलोची प्लास्टिक बादली अडकल्याने महिनाभर  पाणी पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला होता. ही बादली आज (शनिवारी) बाहेर काढण्यात आली आणि नागरिकांची पाणी समस्येतून सुटका झाली. दरम्यान, महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडला आहे. नागरिकांचा मानसिक छळ केला म्हणून पालिकेने नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली.

गेल्या महिनाभरापासून चिंचवड, बिजलीनगर येथील रेल विहार वसाहत व साईराज कॉलनी परिसरातील शेकडो घरांना पाणीपुरवठा अतिशय कमी दाबाने होत होता. त्यामुळे परिसरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली. ही पाणी टंचाई 5 मार्चपासूनच सुरू झाली. गेल्या महिनाभरात काही घरांना अक्षरशः टँकरने पाणी पुरवठा करावा लागला. पाण्याचा पुरवठा अपूर्ण होत असल्याकारणाने नागरिकांच्या तक्रारीत वाढ होत गेल्या. नगरसेवक व अधिकारी यांनाही याबाबत कळवले गेले. परंतु, पाणी टंचाई व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा प्रश्न ‘जैसे थे’च होता.

अखेर आज रेल वसाहत कॉर्नर येथील जलवाहिनीमध्ये काहीतरी अडकले असल्याचे निष्पन्न झाले.  कर्मचाऱ्यांनी जलवाहिनी कापली असता त्यामध्ये 20 किलोची प्लास्टिक बादली अडकल्याचे दिसून आले. ही बादली जलवाहिनीमध्ये अडकून बसली होती. त्यामुळे पाणी पुरवठयात अडथळा निर्माण झाला होता. अखेर तुकडे करून  बादली जलवाहिनीमधून बाहेर काढण्यात आली.

या संदर्भात लिबर्टी लीग ऑफ इंडियाचे मुख्य प्रवर्तक व साईराज कॉलनी मधील रहिवाशी  मकरंद डोईजड म्हणाले, “साईराज कॉलनी मधील रहिवाशी कुटुंबांना सुमारे एक महिना पुरेशा पाण्यापासून वंचित ठेवले. नागरिकांचा मानसिक छळ केला म्हणून महापालिकेने नागरिकांना नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. तसेच  देखभाल नियोजनात प्रशासन कमी पडले. हे या प्रकारामुळे सामोरे आले आहे.”

प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष व ओम साई पार्क मधील रहिवाशी विजय पाटील म्हणाले,” शहरातील जलवाहिनी व त्यासंदर्भातील व्हॉल्व उपकरणे यांची देखभाल दुरुस्तीचा मोठा प्रश्न या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे. वेळीच योग्य देखभाल दुरुस्तीचे  नियोजन केल्यास अशा घटनांना आळा बसेल. बादली जलवाहिनीमध्ये कशी पोहचली ? हा एक वेगळाच विषय आहे. यामुळे पाणीपुरवठा टाकी सफाई कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा उघड झालेला आहे. पेंट केमिकल युक्त बादली मुख्य टाकीपर्यंत पोहचली कशी ? नागरिकांच्या जीवाशी खेळणारा हा प्रकार आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने बघणे आवश्यक आहे. आयुक्तांनी याची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींवर  कारवाई करावी.”

याबाबत पालिकेकडे पाठपुरावा करण्यासाठी साईराज कॉलनीमधील रहिवाशी बिपीन पवार, अमोल पाटील, फतेसिंग देवरे, राहुल भोसले, श्याम देसले, उमेश विसपुते यांनी प्रयत्न केला. याप्रसंगी नगरसेवक नामदेव ढाके सुद्धा  उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.