Chinchwad : सोशल मीडियाच्या जमान्यात संवाद हरवतोय – नम्रता पाटील

रोटरी क्लब ऑफ चिंचवडच्या वतीने 'शिशिर व्याख्यानमाला'

एमपीसी न्यूज- व्हाट्सअप, फेसबुक आणि अन्य सोशल साईट मध्ये आजचा युवक हरवला आहे. एखादी पोस्ट करायची आणि त्यावर लाईक, कमेंट मिळवायच्या यातच तो धन्यता मानत आहे. यामुळे युवा पिढीमधला संवाद हरवत चालला आहे. असे मत पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ चिंचवड-पुणे यांच्या वतीने ‘शिशिर व्याख्यानमाला’ आयोजित करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे उदघाटन पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मल्लिनाथ कलशेट्टी, बाळकृष्ण खंडागळे, मनोहर दीक्षित, संजय खानोलकर, संजीव दात्ये आदी उपस्थित होते. व्याख्यानमालेचे यंदा 22 वे वर्ष आहे.

नम्रता पाटील म्हणाल्या, “सोशल मीडियावर एखादी व्यक्ती आक्षेपार्ह पोस्ट टाकते. त्या पोस्टला मोठ्या प्रमाणात पसरविले जाते. यातून वाद विवाद आणि सामाजिक तेढ निर्माण होते. मूळ पोस्ट टाकणारा बाजूला राहतो आणि अन्य लोकांमध्येच वाद होतो. ही दूषित प्रवृत्ती आहे. ती कमी होऊन युवकांनी वाचन आणि चर्चांमधून विचारमंथन केले पाहिजे. वाचन संस्कृती वाढवायला हवी.”

कार्यक्रमात वसंतराव पाटोळे यांना सेवा गौरव पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराला उत्तर देताना ते म्हणाले, “मूक बधिरांची सेवा करण्याची इच्छा कुटुंबातून मिळाली. तसेच शासकीय सेवा देखील अपंगांशी निगडित झाली. त्यामुळे त्यांच्याबाबत काम सुरू झाले. या पुरस्काराच्या माध्यमातून केलेल्या कामाची पावती मिळाली आहे.”

अॅड. असीम सरोदे यांचे ‘न्यायालयाच्या पाय-यावरून येणारी लोकशाही’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यात ते म्हणाले, “लोकशाहीच्या प्रवाहात अनेक नेते मंडळी येतात आणि जातात, पण लोकशाही कायम असते. एखादा नेता पक्षाचे लेबल लावून इकडून तिकडे जातो. त्यासोबत अनेक कार्यकर्ते सुद्धा जातात. त्या कार्यकर्त्यांनी स्वतःची सदसदविवेकबुद्धी वापरायला हवी. स्वतःची मतं तयार करायला हवी. आपलं प्रत्येक मत राजकीयच असायला पाहिजे असे काही नाही.

नेत्यांच्या मागे जाण्याऐवजी लोकशाहीच्या मार्गाने जायला हवं. जेंव्हा जेंव्हा राजकीय लोकांनी लोकशाहीवर हल्ले चढवले आहेत, त्या प्रत्येक वेळी न्यायव्यवस्था लोकशाहीच्या रक्षणासाठी धावून आली आहे. शबरीमला, समलैंगिक कायदा, आधार बाबत कायदा अशी अनेक उदाहरणे देत त्यांनी लोकशाहीत न्यायव्यवस्थेचे महत्व अधोरेखित केले. कट्टरवादी धर्मांधता ही लोकशाहीला मारक ठरत असल्याचेही सरोदे म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा कुलकर्णी यांनी केले. प्रवीण गुणावरे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.