Chinchwad: जिजाउंपासून ताराराणीपर्यंत सर्व महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध करून मराठेशाही टिकवली – मंजुश्री पवार
एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात मराठ्यांचे सैन्य स्वातंत्र्यासाठी लढत होते. तर, मुघल सैन्य साम्राज्यासाठी लढत होते. असे सांगून छत्रपती शिवरायांच्या काळात या स्वातंत्र्यासाठी राजमाता जिजाउंपासून ताराराणीपर्यंत सर्व महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध करून मराठेशाही टिकवल्याचे मत डॉ. मंजुश्री जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज समाज प्रबोधनपर्व निमित्त आयोजित व्याख्यानमालेत ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील स्त्रीयांचे कर्तूत्व’ या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी माजी महापौर मंगला कदम, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी मान्यवर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
साम्राज्यासाठी लढणार्या सैनिकांबरोबर कितीही मोठ्या प्रमाणात साधनसामुग्री असली आणि त्यांच्यासमोर स्वातंत्र्यासाठी लढणारा दुबळा देश असेल. तर, त्या लढाईत स्वातंत्र्यासाठी लढणारा देश विजय मिळवतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिका व व्हीएतनाम आहेत. या देशांच्या दरम्यान झालेले युद्ध होय. याच प्रमाणे महाराष्ट्रातील थोर महिलांही स्वातंत्र्यासाठी लढल्या व यशस्वी झाल्याचे डॉ. मंजुश्री पवार यांनी संगितले.
राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवरायांवर उत्तम संस्कार तर केलेच. त्या शिवाय राज्यकारभाराची शिकवणही दिली. पतीच्या निधनानंतर सती जाण्याची प्रथा त्या काळात होती. परंतु, छत्रपती शिवरायांच्या राजघराण्यातील महिलांनी हातात तलवार घेऊन मराठी राज्य स्वतंत्र ठेवण्यासाठी लढा दिला. महाराणी येसूबाई व ताराराणी यांनी आपल्या अंगी असलेल्या युद्ध कलेचे दर्शन घडवून मुघल सैन्यावर मात केली. त्यांच्या कर्तृत्वाची प्रेरणा घ्यायला हवी असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले.