Chinchwad : राष्ट्रनिर्मितीचा पाया मातंगऋषी संमेलनात रोवला गेला – गिरीश प्रभुणे

एमपीसी न्यूज – एक काळ असा होता त्या काळी आपला देश (Chinchwad) जगाला अन्न, आयुर्वेद औषधाचा पुरवठा करीत होता. समाजातील वाईट चालीरिती दूर सारून समाजातील चांगले ते स्वीकारले पाहिजे. प्राचीन परंपरेमध्ये ज्ञान, विज्ञान भरभरून आहे. मेकॉलेचा चष्मा काढून समाजाकडे पाहिले पाहिजे. साहित्य संमेलने केवळ कविसंमेलने, पुस्तक प्रकाशनासाठी नाहीत तर अशा संमेलनांच्या माध्यमातून इतिहासाकडे नजर टाकून भविष्याकडे वाटचाल करायची आहे. याची सुरुवात अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीतून झाली असून आता राष्ट्रमंदिराची, भेद विरहित समाज उभा करायचा आहे. याचा पाया मातंगऋषी संमेलनाच्या माध्यमातून रचला गेला आहे, असे गौरवाद्गार संमेलनाध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी काढले.

मातंग साहित्य परिषद, पुणेतर्फे काळेवाडी येथे दुसऱ्या मातंगऋषी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाच्या अध्यक्षपदावरून प्रभुणे बोलत होते. संमेलनाचे निमंत्रक, मातंग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे, स्वागताध्यक्ष शंकर जगताप, माजी मंत्री दिलीप कांबळे, प्राचर्य अनिरुद्ध देशपांडे, निलेश गद्रे, अमित गोरखे, अंबादास सकट, डॉ. संदिपान झोंबाडे, अशोक लोखंडे, भास्कर नेटके, सदानंद भोसले, प्रा. निता मोहिते, प्रसन्न पाटील, किरण मोरे आदी मान्यवर व्यासपीठावर होते.

देशात विद्रोही साहित्याची परंपरा पूर्वापार असून संतांनी, महापुरुषांनी आपल्या साहित्याद्वारे प्रस्थापितांविरोधात मते मांडली, असे नमूद करून प्रभुणे म्हणाले, साहित्याच्या माध्यमातून उभे केलेले बंड हे वैचारिक बंड होते. नदीचे मूळ आणि ऋषीचे कुळ विचारू नये असे म्हणतात पणे ऋषीचे कूळ शोधल्याशिवाय त्यांची महती समजत नाही.

Chinchwad : उसने दिलेले पैसे मागितले म्हणून मजूराला दगडाने मारहाण, आरोपी अटकेत

अनेक ऋषी बहुजन समाजातील होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे समाजातील कुप्रथांवर प्रहार केला. सर्व समाज एकसंघ ठेवण्यासाठी मातंगऋषी यांच्या नावाने साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संमेलनाचे निमंत्रक डॉ. धनंजय भिसे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

स्वागताध्यक्ष शंकर जगताप म्हणाले, औद्योगिक नगरीत साहित्याची रुजवण व्हावी या उद्देशाने संमेलन आयोजित करण्यात आले आहे. मातंगऋषी यांच्या नावाने होत असलेल्या संमेलनाच्या माध्यमातून समाजासाठी मोलाचे कार्य होत आहे, असे मत दिलीप कांबळे यांनी व्यक्त केले. डॉ. सदानंद भोसले यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याची महती विशद करून साठे यांचे साहित्य विविध भाषांमध्ये यावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

समाजजीवनात वावर असणाऱ्या व्यक्तींनी साहित्याचे वाचन करावे अशी अपेक्षा अमित गोरखे यांनी व्यक्त केली. मान्यवरांचे स्वागत स्वागताध्यक्ष शंकर जगताप, डॉ. धनंजय भिसे यांनी केले. सूत्रसंचालन सचिन पवार यांनी तर आभार संदिपान झोंबाडे यांनी मानले. संमेलनाची सुरुवातीस 70 जोडप्यांच्या हस्ते महायज्ञ करण्यात आला तसेच ग्रंथ दिंडी काढण्यात आली. महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून तसेच तुळशीला पाणी घालून संमेलनाचे उद्घाटन करण्यात (Chinchwad) आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.