Chinchwad : …तर महापालिका शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागतील – आयुक्त सिंह

एमपीसी न्यूज – महापालिका शाळांमध्ये शिकल्याचा (Chinchwad) विद्यार्थ्यांना अभिमान वाटेल असे दर्जेदार आणि गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्यासाठी विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे. शिक्षकांच्या अशा कामामुळे महापालिका शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या निश्चितपणे रांगा लागतील, असा विश्वास आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांकरिता संवाद कार्यशाळेचे आयोजन आज (गुरुवार) रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये करण्यात आले होते. यावेळी महापालिकेचे आयुक्त सिंह यांनी शिक्षकांसोबत संवाद साधला. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक प्रशासन अधिकारी रजिया खान, रोहिणी शिंदे यांच्यासह महापालिका शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

महापालिका शाळा, रुग्णालये, उद्यानांसारख्या ठिकाणी दर्जेदार सुविधा दिल्यास नागरिकांचा महापालिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होत असतो. प्रशासनाच्या वतीने महापालिका शाळांना विविध सेवा सुविधा पुरवल्या जातात. मात्र शाळांचा गुणवत्ता स्तर उंचावण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्वाची असते. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थी हा केंद्रबिंदू समजून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव दिला पाहिजे.

विद्यार्थ्यांना बदलत्या जगाची ओळख करून देण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांना प्रेरणा देण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना आधुनिक जगाची ओळख करून देण्याबरोबरच अभ्सासक्रमासोबत विद्यार्थ्यांचे संवादकौशल्य, व्यक्तीमत्त्व विकास यावरही शिक्षकांनी भर दिला पाहिजे, असे आयुक्त सिंह म्हणाले.

ब्लॉकबस्टर चित्रपटाशी तुलना करत सिंह यांनी शिक्षकांना त्यांच्या जबाबदार भूमिकेची जाणीव निर्माण करून दिली. ते म्हणाले, शिक्षकाची भूमिका चित्रपटाच्या दिग्दर्शकासारखी असते. उच्च ध्येय बाळगून जीवनात यशस्वी होणारे विद्यार्थी अशा यशस्वी चित्रपटाचे खऱ्या अर्थाने नायक असतात. विद्यार्थ्यांचे आयुष्य यशस्वी करण्यासाठी दिग्दर्शकरुपी शिक्षकांनी आपले
कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले पाहिजे.

क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियातर्फे शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे. शिक्षकांचा आत्मविश्वास वाढावा, त्यातून महापालिका शाळांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावे, शाळेची गुणवत्ता वाढावी यासाठी संवाद कार्यशाळा महत्त्वपुर्ण ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बालवयात मुलांमध्ये असणारे शारिरीक दोष वेळीच लक्षात.आल्यानंतर त्यावर वेळेत उपचार करणे सहज शक्य आहे.

मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेत असलेल्या बालवाडीकडे लक्ष देऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी समन्वय ठेवावा, असे निर्देश आयुक्त सिंह यांनी यावेळी दिले. यावर्षी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारे बुट, दप्तर, रेनकोट आदींसाठीचे पैसे संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खात्यावर थेट जमा केले जाणार आहेत.

याकडे देखील शिक्षकांनी लक्ष द्यावे, अशी सुचना आयुक्त शेखर सिंह यांनी (Chinchwad) यावेळी दिली. स्कॉलरशिप परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या वतीने भारत दर्शन सहलीचे आयोजन करण्यात येणार असून भविष्यात ‘उत्कृष्ट शिक्षक’ या संकल्पना राबवून अशा निवडक शिक्षकांसाठी देखील विशेष सहलीचे आयोजन केले जाईल, अशी माहितीदेखील आयुक्त सिंह यांनी यावेळी दिली.

यावेळी 10 वी परीक्षेत 90 टक्क्यांपे्क्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेल्या 13 विद्यार्थ्यांचा प्रत्येकी 1 लाख रुपयांचा
धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्या शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. यावेळी शैक्षणिक दिनदर्शिका 2023-24, बालवाडी अभ्यासक्रम हस्तपुस्तिका, बालवाडी उपक्रम दिनदर्शिका 2023-24 चे प्रकाशन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.

पालिकेच्या शाळेची गुणवत्ता नेहमीच उत्कृष्ट दर्जाची राहिली असून, भविष्यातही शालेय सुविधा वेळेत पुरविण्याकडे महापालिका प्रशासन प्रयत्नशील राहील. विद्यार्थ्यांची संपुर्ण आरोग्य तपासणी करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथक नेमण्यात आले आहे. शिक्षकांचे प्रश्न तत्परतेने सोडविण्यासाठी प्रशासन काम करीत असून शिक्षकांनी शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यावेळी म्हणाले.

शिक्षकांसमवेत आयुक्त शेखर सिंह यांनी चर्चात्मक संवाद साधला. शिक्षक आणि प्रशासनामध्ये समन्वय राखण्यासाठी आणि तातडीने समस्यांचे निराकरण करण्यासाठी सारथी हेल्पलाइनवर शालेय सुविधांसंदर्भात तक्रारवजा सुचना संबंधित शाळांच्या शिक्षकांनी कराव्यात. या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी सांगितले.

शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे शालेय कामकाजाची प्रास्तविकामध्ये माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश लिंगडे यांनी केले. तर आभार रामेश्वर पवार यांनी मानले.

Yerawada : येरवडा कारागृहात 13 जून रोजी होणार अभंग स्पर्धेची महाअंतिम फेरी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.