Chinchwad : कवितेच्या चळवळीचा हा पुरस्कार -रामदास फुटाणे
चिंचवड येथील अॅटो क्लस्टरमध्ये यशवंत - वेणु पुरस्काराचे वितरण
एमपीसी न्यूज – समाज परिवर्तन करणे हा कवितेचा उद्देश आहे. समाजाचे प्रश्न कवितेतून मांडता यावे, यासाठी कवितेचा जन्म झाला आहे. यशवंतराव चव्हाणांचा मिळालेला आजचा पुरस्कार हा कवितेच्या चळवळीचा आहे, असे मत वात्रटिकाकार, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक रामदास फुटाणे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.
चिंचवड येथील अॅटो क्लस्टरमध्ये यशवंत – वेणु पुरस्कार वितरण सोहळा आज पार पडला. यावेळी ते बोलत होते. पुरस्कार वितरण ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते पुरस्कार सोहळ्याचे उदघाटन झाले. यावर्षीचा यशवंत- वेणु सन्मान व्यंगकवी, पटकथा लेखक, चित्रपट निर्माते दिग्दर्शक कविवर्य रामदास फुटाणे व संस्कारक्षम गृहिणी प्रभावती फुटाणे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी हास्कवी अशोक नायगांवकर यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचे प्रणेते उल्हास पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वागताध्यक्ष म्हणून नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे उपस्थित होते.
- पिंपरीतील काकडे प्रॉपर्टीजचे संचालक कुणाल प्रकाश काकडे यांना यशवंतराव चव्हाण युवा उद्योजक पुरस्कार, सोमाटणे येथील माजी उपसरंपच सचिन मु-हे, तर यशवंतराव चव्हाण सह्याद्री पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील ज्ञानगंगा भ्रमणसेवा संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ जगन्नाथ घोंगडे यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी रामदास फुटाणे म्हणाले, पाना- फुलांच्या कवितांपेक्षा त्यांनी राजकीय प्रसंग, वातावरणातील कवितेक्षा आजूबाजूला जे घडतंय, त्यावर कविता करणे पसंद केले. त्यातूनच त्यांचा एक रसिकवर्ग झाला. कवींनी कोणत्याही विचारसरणीच्या आहारी न जाता सामाजिक, राजकीय विषमतेवर त्रयस्थपणे भाष्य करणे अपेक्षित असते.
- आजचे वातावरण पाहिले, की मूलत्त्ववाद्यांची चळवळ पुन्हा वर डोके काढते की काय? अशी भीती वाटते. सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली आहे. सध्या चित्रविचित्र असे राजकारण सुरु आहे. वारक-यांचे हिंदुत्व सर्वसमावेशक आहे. हिंदुत्वाची व्याख्या नव्यापिढीला सांगण्याची गरज आहे. आज माणसातल माणुसपण हरवत चालले आहे. माणसांमध्ये पशुत्व आले आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, कविता ही विनोदासाठीच नाही तर समाजातील प्रश्न मांडण्यासाठी असते. एकत्र कुटुंब पध्दतीत जे संस्कार होतात ते विभक्त कुटुंबात होत नाही. एकत्र कुटुंब पध्दततील संस्कृतीची ओळख आजच्या पिढीला नाही.
यावेळी कुणाल काकडे, सचिन मु-हे, वैजिनाथ घोंगडे, यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचे प्रणेते उल्हास पवार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रकाश आणि अजिंक्य काकडे यांच्याकडून नदी स्वच्छतेसाठी वैजिनाथ घोंगडे यांना पंचवीस हजार रुपयांची रोख रक्कम म्हणून आर्थिक मदत केली.
- त्यानंतर रंगनाथ पठारे म्हणाले. दुनिया ही शब्दाची नसून परोपजीवी झाली आहे. यशवंतरावांनी जो पाया आपल्याला घालून दिला होता, तो जपला असता, पुढे नेला असता तरी साहित्य-संस्कृतीसाठी खूप मोठी कामे झाली असती.’’
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले. सूत्रसंचालन उध्दव कानडे यांनी केले. जयवंत भोसले यांनी आभार मानले.