Chinchwad : मुलांच्या हातात मोबाईलऐवजी शिवचरित्र द्या – आशुतोष झा

एमपीसी न्यूज – “मुलांच्या हातात महागडा मोबाईल देण्याऐवजी शिवचरित्र दिल्यास राष्ट्र घडेल!” असे मत एकोणीस वर्षीय युवा व्याख्याता आशुतोष झा याने चिंचवड येथे व्यक्त केले. सिध्दिविनायक चिंचवड येथे स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय सिद्धिविनायक वार्षिक व्याख्यानमालेत ‘हिंदुत्व : एक आदर्श जीवनप्रणाली’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना आशुतोष झा बोलत होते.

नगरसेविका मंगला कदम, नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेवक तुषार हिंगे, बांधकाम उद्योजक नामदेवराव पोटे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ मस्के, उपाध्यक्ष अनिल गोडसे, सचिव राजेंद्र घावटे, अरविंद वाडकर, दत्ता पटवेकर उपस्थित होते.

  • यावेळी आशुतोष झा म्हणाला की, “अखंड हिंदुस्थानचा शेवटचा सम्राट पृथ्वीराज चौहान हा अतिशय पराक्रमी, लक्षवेधी योद्धा होता. महंमद घोरी याने चौदा वेळा आक्रमण केले; आणि प्रत्येकवेळी तो पराभूत झाला; पण, केवळ एका पराभवामुळे पृथ्वीराज चौहान यांना हौतात्म्य पत्करावे लागले. महंमद घोरीच्या कबरीसमोर असलेल्या पृथ्वीराज चौहान यांच्या पवित्र समाधिस्थळाच्या वाट्याला उपेक्षा आणि विटंबना आली. प्रतापगडावर अफजलखानाची कबर पूर्वी अगदी छोट्या जागेत होती आणि आता त्या कबरीच्या नावाखाली खूप मोठ्या जागेवर अतिक्रमण झालेले असून हिंदू महिला त्या कबरीसमोर नवस बोलतात, हा केवढा मोठा दैवदुर्विलास आहे.

काश्मीर खोऱ्यात सात लाख हिंदू इस्लाम दहशतवादामुळे विस्थापित झाले. स्वातंत्र्यकाळात फाळणीच्या वेळी जे अनन्वित अत्याचार हिंदुंवर झाले तेच अजूनही काश्मीर आणि केरळमध्ये होतात; आणि सहिष्णुतेच्या नावाखाली आम्ही त्याविरोधात ब्र शब्दही काढायला तयार नाही. लव जिहादच्या वीस हजारांपेक्षा जास्त केसेस प्रलंबित आहेत. विदेशातून हिंदू धर्म नष्ट व्हावा म्हणून मोठ्या प्रमाणावर पैसा पुरवला जातो; आणि हिंदू युवकांचा बुद्धिभेद केला जातो. हिंदू धर्म, देवदेवता, सण यांची प्रसारमाध्यमे आणि चित्रपटसृष्टीमधून टिंगल टवाळी केली जाते. बहुसंख्य हिंदू असलेल्या आपल्या देशात हिंदुत्वाविषयी कोणी बोलले तर त्याला भगवा दहशतवादी ठरवले जाते. सर्वधर्मसमभाव जरूर पाळावा; पण आपल्या धर्माचा अभिमान बाळगणे हा गुन्हा आहे का? गोव्यात ख्रिश्चन मिशनऱ्यांनी पुरातन शिवमंदिर भ्रष्ट केल्याचे समजल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची पुन:स्थापना केली होती. धर्माभिमान कसा असावा हे शिवचरित्र आम्हाला शिकवते.

  • अतिशय खणखणीत आवाजात ‘जय श्रीराम’ असा जयघोष आणि धार्मिक श्लोक उद्धृत करीत आशुतोष झा याने व्याख्यानविषयाचे विवेचन केले. समारोप करताना छत्रपती शिवाजी, संभाजीमहाराज आणि भारत माता यांचा सामुदायिक जयघोष करण्यात आला. शुभम पटवेकर, तेजस मांदळे, स्वानंद थोरात, विजय आढाव, ओंकार गंगा, सूरज बोत्रे, स्वप्निल बेल्हेकर या युवकांनी संयोजनात परिश्रम घेतले. संपत बोत्रे यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.