Tuljabhavani : श्री तुळजाभवानी मंदिरातील कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उघड करणारा ‘सीआयडी’ अहवाल; 5 वर्षे दडपून भ्रष्टाचार्यांना अभयदान !
एमपीसी न्यूज : महाराष्ट्राची आराध्यदेवता मानल्या जाणार्या श्री तुळजाभवानी (Tuljabhavani) मातेचे मंदिर संस्थान हे शासकीय नियंत्रणात असताना तेथे वर्ष 1991 ते वर्ष 2009 या कालावधीत सिंहासन दानपेटीच्या लिलावात कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला आहे. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर निकाल देतांना मा. न्यायालयाने सदर प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाचा (सीआयडीचा) चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितला होता.
या ‘सीआयडी’च्या चौकशी अहवालात अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. त्या चौकशी अहवालानुसार दानपेटी लिलावात 8 कोटी 45 लाख 97 हजार रुपयांचा घोटाळा झालेला असून, त्यात दोषी म्हणून 9 लिलावदार, 5 तहसिलदार, 1 लेखापरिक्षक, 1 धार्मिक सहव्यवस्थापक यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच. त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे; मात्र हा चौकशी अहवाल 20 सप्टेंबर2017 या दिवशी अपर मुख्य सचिव, गृह विभाग, महाराष्ट्र राज्य यांना सादर होऊन 5 वर्षे होत आली असली, तरी दोषींवर अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या काळात एक आरोपी मृत झाला आहे, तर घोटाळा प्रारंभ होऊन 31 वर्षे झाली आहेत, मग शासन अन्य आरोपी मृत होण्याची वाट पाहतेय कि यात दोषी ठरवलेल्या शासकीय अधिकार्यांना पाठीशी घालत आहे?
आता तरी महाराष्ट्र शासनाने (Tuljabhavani) गांभीर्य दाखवून तात्काळ सर्व दोषींवर एफ्आयआर् (FIR) दाखल करून त्यांना अटक करावी, तसेच त्यांच्याकडून देवस्थानच्या लुटीची रक्कम चक्रवाढ व्याजासह वसूल करावी. अन्यथा हिंदु जनजागृती समितीला यासाठी रस्त्यावर उतरून राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल, तसेच आवश्यकता भासल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागेल, असा इशारा हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी दिला आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघ ठिकाणी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी पत्रकार परिषदेला हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य तथा याचिका लढवणारे अधिवक्ता (पू.) सुरेश कुलकर्णी उपस्थित होते.
या संदर्भात समितीच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले, तसेच अपहार करणार्या सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्या वेळी गृहराज्यमंत्री म्हणाले की, या संदर्भात अधिकार्यांकडून अधिकची माहिती जाणून घेतो. तसेच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो.
या अहवालात (Tuljabhavani) दोषी ठरवलेल्या आरोपींपैकी मंदिराचा धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याच्यावर श्री तुळजाभवानी मंदिरातील 35 तोळे सोने, तसेच 71 किलो चांदी आणि 71 प्राचीन नाणी गायब केल्याचाही गुन्हा सप्टेंबर 2020 मध्ये नोंद झाला होता. त्या प्रकरणात तो फरार झाला होता; मात्र पोलिसांनी त्याला 20 सप्टेंबर 2011 या दिवशी अटक केली. या एका आरोपीला वगळता चौकशी अहवालात दोषी ठरवलेले राजकीय नेते तथा वरिष्ठ शासकीय अधिकारी यांच्या विरोधात कोणतीही कारवाई आजपर्यंत झालेली नाही. त्यामुळे हिंदु जनजागृती समिती राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांची भेट घेऊन देवधनाची लूट करणार्यांना पाठीशी न घालता त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. या प्रकरणात शासनाने त्वरित कारवाई न केल्यास न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याच्या संदर्भात पुन्हा न्यायालयात याचिका करण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.