Pimpri News : शहरातील युवकांची रायगडावर स्वच्छता मोहिम
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड मधील अस्तित्व फाऊंडेशनच्या युवकांनी गड किल्ले स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. प्रत्येक महिन्याला महाराष्ट्रातील एका गडाला भेट देऊन शिवविचारांचे आणि गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी गडावर स्वच्छता मोहीम राबविली जाते. युवकांनी स्वराज्याची राजधानी रायगड येथे स्वच्छता मोहिम राबविली आहे.
साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या स्वराज्यामध्ये महाराष्ट्रातील गडकोट किल्ले यांना अनन्यसाधारण महत्त्व होते. हे गड किल्ले शिवकालीन कालखंडाचे साक्षीदार आहेत. आजही आपण त्यांचा वारसा जतन करत आहोत. आज-काल गड किल्ले हे पर्यटन स्थळ बनले. असले तरी बहुतांश शिवप्रेमी या वारशाचे संवर्धन करण्यासाठी पुढे येत असतात. याच विचारातून पिंपरी-चिंचवड मधील अस्तित्व फाऊंडेशनच्या युवकांनी गड किल्ले स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.
प्रत्येक महिन्याला महाराष्ट्रातील एका गडाला भेट देऊन शिवविचारांचे आणि गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी गडावर स्वच्छता मोहीम राबविली जाते. अस्तित्वच्या युवकांनी स्वराज्याची राजधानी रायगड येथे स्वच्छता मोहिम राबविली.
या मोहिमेविषयी माहिती देताना तुकाराम सुवर्णकार यांनी सांगितले की, तरुण मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रुजवण्याबरोबरच त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा असलेले किल्ले स्वच्छ ठेवणे ही जबाबदारी पार पडण्यासाठी आम्ही गडावर स्वच्छता करतो. पर्यटकांकडून किल्ल्याच्या परिसरात टाकलेल्या प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या, खाऊचे पुडे गोळा करून गडावरून खाली घेऊन त्याची विल्हेवाट लावतो.
अस्तित्व शिवविचारांचे कार्य संवर्धनाचे! या विचाराने अस्तित्व फाऊंडेशनचा हा उपक्रम लोकांमध्ये गड किल्ल्यांविषयी अस्मिता निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे अस्तित्व च्या दुर्गसंवर्धन विभागा चे विभाग प्रमुख खूशल काळे यांनी सांगितले. या मोहिमेमध्ये पिंपरी-चिंचवड मधील सुमारे 35 युवकांनी सहभाग घेतला.