Pimpri : सांगवीत भाऊबीजेच्या दिवशी स्वच्छता अभियान
एमपीसी न्यूज – दिवाळीत फटाक्यांमुळे झालेला कचरा आरोग्यास धोकादायक ठरू शकतो, याची जाणीव बाळगत मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या सामाजिक संस्थेच्या वतीने नवी सांगवी, सी.एम.ई व समता नगर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी सांगितले की, दिवाळीत हवेतील प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ होतांना दिसते. लक्ष्मीपूजन व पाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व सफर या शासकीय संस्थेने हवेतील सूक्ष्म व अति सूक्ष्म धुलिकणाचे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. फटाक्यांचा कागदांचा मोठ्या प्रमाणात कचरा अगदी गल्ली बोळात ही रस्त्यावर पहावयास मिळतो. अशा वेळी महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी ही स्वच्छतेसाठी कमी पडतात. त्यांच्यावर दररोजच्या कामापेक्षा दिवाळीत जास्त कामाचा ताण येतो. या बाबी लक्षात घेऊन स्वच्छता मोहीम राबविली.
अॅड सचिन काळे यांनी सांगितले की, जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे, असे समजून आम्ही सामाजिक उपक्रम राबवत असतो. यावेळी आम्ही एकत्र स्वच्छता मोहीम न राबवता गटागटाने स्वच्छता मोहीम हाती घेतली. त्यामुळे लवकर परीसर स्वच्छ होण्यास मदत झाली. यावेळी शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, ऍड सचिन काळे, मुरलीधर दळवी, संगीता जोगदंड, हनुमंत शेळके, वसंतराव चकटे, हनुमंत पंडित, गजानन धाराशिवकर अरूण शिंदे व स्थानिक नागरीकांनी ही सहभाग नोंदवला.