Pune News : पशुसंवर्धन आयुक्तांनी मारला चिकनवर ताव !
एमपीसी न्यूज : देशातील बहुतांश राज्यांसह महाराष्ट्रात बर्ड फ्लू दाखल झाला आहे. परंतु पक्षी वगळता मानवी संक्रमणाचा धोका नसल्याचा निर्वाळा देत पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी स्वत: चिकन व अंडी खात जनजागृती व प्रबोधन केले.
गणेशखिंड रस्ता औंध येथील पशुसंवर्धन आयुक्तालयात चिकन फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ.धनंजय परकाळे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आयुक्त सिंह म्हणाले, राज्यात केवळ लातूर, नांदेड, परभणी आणि रायगड येथे बर्ड फ्लूमुळे कोंबड्या आणि अन्य पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. त्यावर खबरदारीचा उपाय म्हणून एक किलोमीटरच्या परिक्षेत्रातील पक्ष्यांची शास्त्रशुद्ध विल्हेवाट करण्यात येत आहे. दरम्यान, पुण्यात दौंड आणि अन्य पक्ष्यांचा मृत्यू अहवाल नकारात्मक आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, यासाठी चिकन फेस्टिव्हलच्या माध्यमातून जनजागृती व प्रबोधन करत आहोत.