Pune News : काँग्रेस गाजावाजा करत नाही , प्रत्यक्ष मदत करते- नाना पटोले

एमपीसी न्यूज – पुणे ः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आलेल्या पूर परिस्थितीत नागरिकांच्या नुकसानाची पाहणी करण्यावर भर देण्यापेक्षा थेट मदत पोचवण्यावर काँग्रेस पक्षाचा भर आहे. पुण्यातील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्या पुढाकारातून शहर काँग्रेसतर्फे सांगली कोल्हापूर या भागातील पुरामुळे बाधित नागरिकांना मदत पाठविण्याचा कार्यक्रम अतिशय प्रेरणादायी असून साऱ्या महाराष्ट्रातूनच या पूरग्रस्त भागांमध्ये मदत पाठवली जात आहे. त्याचा श्री गणेशा पुण्यात आबा बागुल यांच्या पुढाकाराने होत आहे, ही आनंदाची बाब आहे, असे उदगार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, आमदार नाना पटोले यांनी आज काढले.

सारसबाग येथे झालेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते.
पटोले म्हणाले की, नैसर्गिक संकटाच्या वेळी धावून जाण्यात काँग्रेसचा नेहमीच पुढाकार घेत राहिला आहे. पूरग्रस्त भागाची पाहणी करणे, नुकसानीचा अंदाज घेणे हे शासकीय पातळीवर आवश्यकच आहे. मात्र, काँग्रेस पक्षाने केवळ पाहणीवर भर न देता थेट मदत करण्यावर भर दिला असून या पूरग्रस्त भागातील नागरिकांना आधार देण्याचे काम काँग्रेस पक्ष करीत आहे. यापूर्वीही काँग्रेस पुरग्रस्तांच्या मदतीला सदैव धावून आली आणि पुढेही राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सारसबाग येथे तीन ट्रक भरून पूरग्रस्तांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम त्या ट्रकला हिरवा झेंडा दाखवला. त्याप्रसंगी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी आमदार मोहन जोशी, नगरसेवक अविनाश बागवे व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी संयोजक आबा बागुल म्हणाले की, नैसर्गिक अपत्तीवेळी मदतीला धावून जाण्यात आम्ही सदैव पुढाकार घेतला आहे. दोन वर्षांपूर्वी देखील सांगली, कोल्हापूर भागांत पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तेंव्हाही मोठी मदत केली होती. आताही करत आहोत, आता ही मदत गोळा करून जिल्हाधिकारी अथवा तहसीलदार यांच्याकडे न देता आम्ही थेट नागरिकांना वाटणार आहोत. त्यामुळे ती लगेच मिळेल.

नैसर्गिक आपत्ती आली की, मदतीला धावून जाणे, हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. याच बरोबर अति मुसळधार पाऊस पडणे, नद्यांना पूर येणे, त्यामुळे वित्तहानी होणे आणि नागरिकांना जीव गमवावा लागणे हे वर्षानुवर्षे सुरूच आहे. हे रोखण्यासाठी अधिक प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अनेक तज्ज्ञ टाऊन प्लॅंनर यांच्याशी चर्चा करून संपूर्ण कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील भागांचे सर्वेक्षण करून पुन्हा मोठा पाऊस झाल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितून पूर येऊ नये, आल्यास गावांचे, शहरांचे, नागरिकांचे नुकसान होऊ नये. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येईल याचा मास्टर प्लॅन तयार करण्याचा आम्ही संकल्प केला आहे. लवकरच त्याचे काम सुरू होत असून महाराष्ट्र शासनाला त्याचा अहवाल सादर करणार आहोत. त्यामुळे आपत्तीतून होणारे नुकसान टळेल, असे आबा बागुल म्हणाले.

हे मदत कार्य सांगलीतील शिरोळ,आलास, बुबनाळ, कुरुंदवाड येथे तीन दिवसांत थेट वाटप करण्यात येणार आहे. त्यामध्ये 2000 रेशन किट (साखर,चहापत्ती, मीठ,हळद,लाल तिखट,तांदूळ, साबण,डाळ), 1000 ब्लॅंकेट, 2000 सोलापूरच्या भाकरी व चटणी,1000 साड्या, 3000 मास्क,1000 सॅनिटायझर आदी साहित्य आहे. सोबत सुमारे 50 कार्यकर्ते असून हे कार्यकर्ते मदत वाटपात सहभागी होणार आहेत. शिवाय तेथील गावकऱ्यांवरती ताण येऊ नये, यासाठी हे कार्यकर्ते स्वतःचे जेवण स्वतःच बनवणार आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर कोणतीही जबाबदारी पडू नये, याची खबरदारी त्यांनी घेतली आहे. तसेच झाडू, फावडे, घमेली आदी साहित्य सोबत घेतले आहे. पूरग्रस्त भागातील कचरा, गाळ काढण्यात येणार आहे. स्वच्छता करण्याचे काम कार्यकर्ते करणार आहेत.

तीन दिवसांच्या या मदत वाटप कार्यक्रमात पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागूल यांच्यासह हेमंत बागूल,महेश ढवळे, सागर आरोळे, धनंजय कांबळे ,बाबासाहेब पोळके, इम्तियाज तांबोळी, अभिषेक बागूल या प्रमुख कार्यकर्त्यांसह 50 कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.