Pimple Gurav : मस्तवाल भाजपला सत्तेतून खाली खेचा – अशोक चव्हाण

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा पिंपरीत

एमपीसी न्यूज – पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच एकमेव धोरण केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारचे आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकी वेळी दिलेले एकही आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही. राज्यात बेरोजगारी वाढली आहे. कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या असून प्रश्न सोडविण्यास सत्ताधा-यांना वेळ नाही. सत्ताधारी मस्तवाल झाले आहेत. त्यामुळे मस्तवाल झालेल्या भाजपला सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी केले. तसेच पिंपरी-चिंचवड शहराकडे आजपर्यंत दुर्लक्ष केल्याची कबुली देत यापुढे लक्ष्य देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची 31 ऑगस्टपासून जनसंघर्ष यात्रा सुरु झाली असून सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातून आज (शुक्रवारी) पिंपरी-चिंचवडमध्ये यात्रा दाखल झाली आहे. पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले सभागृहात झालेल्या सभेत चव्हाण बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, आमदार भारत भालके, संग्राम थोपटे, शरद रणपिसे, बाळासाहेब शिवरकर, प्रवक्ते रत्नाकर महाजन, शहराध्यक्ष सचिन साठे, गिरीजा कुदळे, श्यामला सोनवणे, संग्राम तावडे, नरेंद्र बनसोडे, मयुर जयस्वाल आदी उपस्थित होते.

अशोक चव्हाण म्हणाले, ‘भाजपने 2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जनतेला खोटी आश्वासने दिली. खोट्या  जाहिराती देऊन ख-या अर्थाने जनतेची दिशाभूल केली.  महाराष्ट्रात असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. बेरोजगारी वाढली आहे. कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. शेतक-यांच्या आत्महत्य वाढल्या आहेत. महागाई गगनाला भिडली आहे. या प्रश्नांवर काँग्रेसने वेळोवेळी सभागृहात, रस्यावर उतरून सरकारला जाब विचारला आहे. परंतु, बहुमताच्या जोरावर सरकार काहीही निर्णय घेत आहे. विरोधकांचे मत समजून घेतले जात नाही’.

‘पैशांतून सत्ता आणि सत्तेतून पैस हेच एकमेव समीकरण सत्ताधा-यांचे झाले आहे. त्याच्या जोरावर देश, महाराष्ट्रासह उर्वरित राज्य जिंकली. त्याच जोरावर पुन्हा सत्तेत येऊ शकतो, असे सत्ताधा-यांना वाटत आहे. परंतु, आता ती परस्थिती राहिली नाही. जनभावना बदली आहे. जनतेला आपले प्रश्न मांडणारा पक्ष पाहिजे असून काँग्रेस जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडत आहे. त्यामुळे जनतेचा कल काँग्रेसकडे वाढत असून पक्षाला मोठा पाठिंबा मिळत आहे’, असे चव्हाण म्हणाले.

‘सत्ता असताना पिंपरी-चिंचवड शहकाकडे दुर्लक्ष केल्याचे मान्य करत’ चव्हाण म्हणाले, ‘शहरात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे.  पक्षाच्या पडत्या काळातही सचिन साठे काम करत आहेत. काँग्रेसचे अस्तित्वत टिकवत आहेत, याची जाणीव मला असून आगामी काळात ताकद दिली जाईल’.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘भाजपने सत्तेत येताना भली मोठी स्वप्ने दाखविली होती. आश्वासनांची खैरात केली. परंतु, गेल्या चार वर्षात एकाही आश्वासनाची पुर्तता करण्यात आली नाही. तब्बल 30 वर्षानंतर एका पक्षाला बहुमत मिळाले होते. यातून कसे सावरायचे असे वाटले होते. परंतु, चार वर्षात सरकार अपयशी ठरले असून जनता सरकारवर प्रचंड नाराज आहे. अर्थव्यवस्था उधवस्त झाली आहे’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.