Wagholi News : विकासकामांमधील ग्रामस्थांची सहमती गावाच्या प्रगतीसाठी फायदेशीर : जिल्हाधिकारी

एमपीसीन्यूज : ग्रामस्थांनी एकमताने निर्णय घेतलयास गावाच्या विकासाला गती मिळते. पाणंद रस्त्यासाठी केसनंद ग्रामस्थांची सहमती कौतुकास्पद आहे. अशाच सहमतीने गावातील पाणीपुरवठा, रस्ते आणि कचरा व्यवस्थापन आदी विकासकामे जलदगतीने पूर्ण करणे शक्य आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत केसनंद (ता. हवेली) येथेदोन पाणंद रस्ते कामाचे भूमिपूजन जिल्हाधिकारी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. केसनंद येथील पाणंद रस्त्याचा 50 हून अधिक शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अपर तहसिलदार विजयकुमार चोबे, आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गायकवाड, सचिन खरात, पोलीस निरीक्षक मानकर, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, मंडळ अधिकारी किशोर शिंगोटे, तलाठी बाळासाहेब लाखे, केसनंदच्या सरपंच रोहिणी जाधव, उपसरपंच सुनिता झांबरे, मिलिंद हरगुडे, वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी, वाघोली मंडळ क्षेत्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पोलीस विभाग व निर्वाचित लोकप्रतिनिधी यांची बैठक ग्रामपंचायत सभागृहात पार पडली. यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत केलेली कार्यवाही व येणाऱ्या अडचणी जिल्हाधिकारी देशमुख यांनी जाणून घेतल्या.

तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, गृहविलगीकरण करण्यात आलेल्या कोरोनाबाधितांनी सुचनांचे पालन न केल्यास सक्तीचे संस्थात्मक विलगीकरण करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी देशमुख यांनी संबंधितांना दिल्या. तसेच प्रशासकांनी मांडलेल्या अडचणींवर अपेक्षित सहकार्य व निधी तात्काळ देणेची ग्वाहीही त्यांनी दिली.

यावेळी उपजिल्हाधिकारी संजय तेली व उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.