
Pimpri : चिखलीत जलशुद्धीकरण केंद्र बांधणे, पाईपलाईन टाकण्यासाठी 122 कोटींचा खर्च
स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज – महापालिका हद्दीतील वाढीव क्षेत्रातील गावांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी आंद्रा आणि भामा आसखेड धरणातील पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी चिखलीत बांधण्यात येणा-या 100 दक्षलक्ष लीटरचे जलशुद्धीकरण केंद्र प्रकल्पाच्या 79 कोटी आणि या प्रकल्पासाठी देहू, बोडकेवाडी येथपर्यंत पाईपलाईन टाकण्यासाठी येणा-या 46 कोटी अशा 122 कोटींच्या कामाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. या कामांचे उद्या (रविवारी) लगेच भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीची आज (शनिवारी) विशेष सभा घेण्यात आली होती. विलास मडिगेरी सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

आंद्रा व भामा आसखेड धरणातील मुख्य जलवाहिनी मंगरूळ व करंजविहिरे ते नवलाख उंब्रे येथील नियोजित बीपीटीपर्यंत व एकत्रित गुरूत्व जलवाहिनी नवलाख उंब्रे ते बीपीटी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका पर्यायी पाणीपुरवठा योजनेसाठी देहू येथील बंधा-यातून चिखलीत पाणी आणणार आहे. तेथून जवळच्या गावाला पाणी पुरवठा केला जाणार आहे. देहू बंधा-यातून 100 एमएलडी पाणी उचलण्यात येणार आहे.
त्याकरिता चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे. जलशुद्धीकरण केंद्राच्या बांधकामासाठी एकूण 46 कोटी 48 लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. तर, पुढील 10 वर्षांसाठी 100 दक्षलक्ष लीटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे चालन, देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी 32 कोटी 54 लाख 60 हजार रुपये खर्च येणार आहे. गोंडवाना इंदिनियर्स या ठेकेदाराला एकूण 79 कोटी 2 लाख 60 हजार रुपयांत हे काम देण्यात आले.
या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत देहू बंधा-यातून पाणी आणण्यासाठी पाईपलाईन टाकण्याच्या कामालाही मान्यता देण्यात आले आहे. रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदाराला हे काम दिले असून त्यासाठी येणा-या 43 कोटी 27 लाख 5 हजार 400 रुपयांच्या अशा एकूण 122 कोटींच्या कामाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
