Pimpri Corona News: दुसऱ्या लाटेत ‘को-मॉर्बिड’ नसलेल्या 30 टक्के रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी,महापालिका आयुक्तांची माहिती
कोरोनाने मृत्यू झालेल्या 66 टक्के लोकांना होता हायपर टेन्शनचा त्रास
पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ) आणि विविध सामाजिक संस्था तर्फे आयोजित ऑनलाइन संवादात आयुक्त पाटील यांनी ही माहिती दिली. आयुक्त पाटील म्हणाले, पहिल्या, दुसऱ्या लाटेतील अनुभव लक्षात घेऊन नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. एप्रिल पासून दुसरी लाट सुरू झाली. एप्रिल, मे महिने कठीण होते. पॅनिक परिस्थिती निर्माण झाली होती. मृत्यूचे प्रमाण वाढले. नेहरूनगर येथील जम्बो, वायसीएमएच, आदित्य बिर्ला आणि डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये एप्रिल, मे महिन्यात 1 हजार 727 जणांचे मृत्यू झाले. त्यातील 1500 मृत्यूचे एनालिसिस केले. मृत्यू झालेले 21 टक्के लोक 45 वर्षाखालील होते. 32 टक्के लोक 46 ते 60 वर्षाच्या दरम्यान होते. तर, 47 टक्के लोक 60 वर्षापुढील होते.
45 वर्षाखालील 14 टक्के लोक व्याधीग्रस्त (‘को-मॉर्बिड’) नव्हते. कोणताही आजार नसताना 14 टक्के तरुणांचा केवळ कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 46 ते 60 वयोगटातील 15 टक्के लोकांनाही कोणताही दुर्धर आजार नव्हता. कोणताही आजार नसलेले 15 ते 30 वयोगटातील 2 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. दुर्धर आजार नसतानाही झालेल्या मृत्यूमध्ये 29 टक्के पुरुष तर 14 टक्के महिला आहेत. मृत्यू झालेल्या 66 टक्के लोकांना हायपर टेन्शनचा तर 44 टक्के लोक डायबेटीक असल्याचे दिसून येते असे सांगत आयुक्त पाटील म्हणाले, अनेक जण गाफील राहिले. ऑक्सिजन पातळी 80 च्या खाली पोहोचलेल्या 33 टक्के जणांचा मृत्यू झाला आहे. या स्टेजमध्ये लग्ज मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेले असते.
60 च्या खाली ऑक्सिजन पातळी असलेले 12 टक्के लोक होते. 60 ते 80 च्या दरम्यान 21 टक्के आणि 80 ते 90 ऑक्सिजन पातळी असलेले 37 टक्के लोक होते. 90 च्या खाली ऑक्सिजन पातळी येणे धोकादायक आहे. मृत्यू झालेल्या 70 टक्के लोकांची ऑक्सिजन पातळी 90 च्या खाली आली होती. ते उशिरा रुग्णालयात दाखल झाले होते. 80 च्या खाली ऑक्सिजन पातळी असलेले रुग्ण जास्त गंभीर होते. लोकांनी आजार अंगावर काढला.
पहिल्या लाटेत संसर्गाचे प्रमाण कमी होते.दुसऱ्या लाटेत संसर्गाच्या प्रमाण जास्त होते. घरातील एखाद्या सदस्याला लागण झाल्यास सर्वांना होत होता. कुटुंबचे कुटुंब रुग्णालयात दाखल होती. त्याच्या संपर्कातील लोकांनाही लागण झाली. प्रसार जास्त असल्याने दिवसाची रुग्णसंख्या 3 हजारांपर्यंत गेली होती. या आजाराचे नेचर समजून घेण्यात गॅप राहिला. समजून घेऊन सावध होणे कमकुवत राहिले. त्यामुळे लोक गाफील राहिले. कोरोना उपचार पद्धतीच्या नियमावलीचे पालन झाले नाही, असे आयुक्त पाटील म्हणाले.
…संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना!
या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना लोकांपर्यंत व्यवस्थित माहिती जाणे गरजेचे आहे. लोकांना जागृत करणे आवश्यक आहे. योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे. लहान, तरुण मुले, युवक, वयोवृद्ध, उचवर्णीय, मध्यमवर्गीय, झोपडपट्टीतील लोक, स्थलांतरित लोक आहेत. वेगवेगळ्या गटासाठी कम्युनिकेशन चॅनेल सुरू करण्याचा विचार सुरु आहे. वेगवेगळ्या शाळांमधून शिक्षकांची टीम घेतली आहे.