BCCI: दहा महिन्यांपासून भारतीय खेळाडूंना बीसीसीआयने मानधनच दिलं नाही

Cricket world’s richest board BCCI hasn’t paid its star players in 10 months संस्थेकडे 5 हजार 526 कोटी रुपयांचा बँक बॅलन्स आहे. याव्यतिरिक्त 2 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम बीसीसीआयने मुदत ठेव स्वरुपात ठेवली आहे.

एमपीसी न्यूज – जगातलं सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी बीसीसीआयची ओळख आहे. मात्र, कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीचा फटका बोर्डाला बसलेला दिसतो आहे. गेल्या दहा महिन्यांपासून भारतीय संघातील प्रमुख करारबद्ध खेळाडूंना बीसीसीआयने मानधन दिलं नसल्याची बाब समोर आली आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, भारताचे 27 खेळाडू बीसीसीआयच्या विविध करारश्रेणीत मोडले जातात. या सर्व खेळाडूंना गेल्या ऑक्टोबरपासून त्यांचं मानधनच मिळालेलं नाही.

इतकंच नव्हे तर डिसेंबर 2019 पासून भारतीय संघाने खेळलेल्या दोन कसोटी, 9 वन-डे आणि 8 T20 सामन्यांची मॅच फी ही बीसीसीआयने अद्याप दिलेली नसल्याची धक्कादायक बाब समोर येते आहे.

बीसीसीआय भारतीय खेळाडूंना A+, A, B आणि C अशा 4 श्रेणींमध्ये विभागते. यात A+ दर्जाच्या खेळाडूंना वर्षाला 7 कोटी (रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह) मानधन मिळतं, तर उर्वरित श्रेणींमधील खेळाडूंना अनुक्रमे 5, 3 आणि 1 कोटी रुपये वार्षिक मानधन मिळतं.

याव्यतिरीक्त कसोटी, वन-डे आणि T20 यासाठी बीसीसीआय आपल्या खेळाडूंना अनुक्रमे 15 लाख, 6 लाख आणि 3 लाख अशी मॅच फी देते.

बीसीसीआयने जाहीर केलेल्या आर्थिक रेकॉर्डनुसार, संस्थेकडे 5 हजार 526 कोटी रुपयांचा बँक बॅलन्स आहे. याव्यतिरिक्त 2 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम बीसीसीआयने मुदत ठेव स्वरुपात ठेवली आहे.

याव्यतिरिक्त 2018 साली भारतीय संघाच्या सामन्यांच्या प्रेक्षपणाचे हक्क देण्यासाठी बीसीसीआयने स्टार इंडिया सोबत करार केला, ज्यातून संस्थेला 6 हजार 138 कोटी रुपये मिळाले. तरीही भारतीय संघातील करारबद्ध खेळाडूंना 10 महिन्यांपासून आपलं मानधन मिळालेलं नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.