Cyclone Amphan Update: प. बंगाल, ओदिशाच्या किनारपट्टीवर हाहाकार, 10 ते 12 जणांचा मृत्यू, एक लाख कोटींचे नुकसान?
एमपीसी न्यूज – पश्चिम बंगाल व ओदिशाच्या किनारपट्टीला ताशी 160 किलोमीटर वेगाने काल (बुधवारी) दुपारी धडकलेल्या अम्फन चक्रीवादळाने दोन्ही राज्यांमध्ये प्रचंड हानी केली आहे. वादळ आणि अतिवृष्टीमुळे सुमारे 10 ते 12 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अम्फन चक्रीवादळ काल दुपारी अडीचच्या सुमारास पश्चिम बंगालमधील दीघा आणि बांगलादेशमध्ये हटिया बेटाच्या किनाऱ्यावर धडकले. या वादळामुळे पश्चिम बंगालमध्ये किमान एक लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे.
चक्रीवादळामुळे समुद्रकिनाऱ्याजवळील परिसरात प्रचंड नुकसान झालं. मोठ्या संख्येने वृक्ष आणि विजेचे खांब उन्मळून पडले असून घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली असल्याचे वृत्त आहे. चक्रीवादळामुळे किनारपट्टीच्या भागातील वीजपुरवठा तसेच मोबाईल फोन संपर्क खंडित झाला आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, राज्याचे झालेले नुकसान शब्दात किंवा आकड्यांमध्ये सांगता येणार नाही. किमान 10 ते 12 जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. नेमके किती नुकसान झाले याचा अंदाज बांधण्यासाठी अजून काही दिवस लागतील. तरीही हे नुकसान किमान एक लाख कोटी रुपयांच्याही पुढे असेल, असा प्राथमिक अंदाज आहे.
चक्रीवादळाचा जोर ओसरला
भूभागाला धडकल्यानंतर अम्फान चक्रीवादळाचा वेळ हळूहळू मंदावत आहेत. हवामान विभागाने चक्रीवादळाच्या पुढील वाटचालीचा अंदाज जाहीर केला आहे. यानुसार अम्फन चक्रीवादळ ताशी 60 ते 70 किमी वेगाने बांगलादेशात पोहोचून यानंतर बांगलादेशच्या सीमेवरुन बाहेर पडत मेघालय आणि आसाममध्ये शांत होईल.
हवामान विभागाने चक्रीवादळाच्या पुढील वाटचालीचा अंदाज जाहीर केला आहे. यानुसार अम्फन चक्रीवादळ ताशी 60 ते 70 किमी वेगाने बांगलादेशात पोहोचून यानंतर बांगलादेशच्या सीमेवरुन बाहेर पडत मेघालय आणि आसाममध्ये शांत होईल.
ओदिशात चक्रवादळाची तीन बळी
पश्चिम बंगालच्या तुलनेत ओदिशामध्ये चक्रीवादळाचा कहर थोडा कमी दिसून येत आहे. ओदिशाच्या बालासौर, भद्रक आणि केंद्रपाडामध्ये सर्वाधिक फटका बसला आहे. या परिसरांमध्ये हवेचा वेग ताशी 110 किमीपेक्षा जास्त नव्हता. तरीही ओडिशामध्ये आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
जवळपास साडेसहा लाख नागरिकांचे स्थलांतर
चक्रीवादळ धडकण्यापूर्वी प्रशासनाने पश्चिम बंगाल आणि ओदिशामधील सुमारे 6 लाख 58 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवल्यामुळे मोठी जीवितहानी टाळण्यात यश मिळाले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर धडकण्याच्या वेळी चक्रीवादळाच्या केंद्राजवळ हवेचा वेग ताशी 160-170 किमी होता. हावडा आणि उत्तरेकडील 24 परगना जिल्ह्यात वृक्ष उन्मळून पडल्याने दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
NDRF चे बचावकार्य युद्धपातळीवर
NDRF ने ओदिशामध्ये 20 पथके तैनात केली आहेत, तर पश्चिम बंगालमध्ये 19 पथके तैनात आहेत. ओदिशामध्ये एनडीआरएफच्या पथकांनी पडलेली झाडे, विजेचे खांब बाजूला करून रस्ते रिकामे करण्याची मोहीम हाती घेतली आहे. तर पश्चिम बंगालमध्ये तैनात असलेल्या पथकांनीही नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवले आहे. पश्चिम बंगालमध्ये सुमारे पाच लाख आणि ओदिशात सुमारे 1 लाख 58 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हालवले आहे.
– एस. एन. प्रधान, संचालक, NDRF
West Bengal: Streets in Kolkata waterlogged, trees uprooted and houses damaged due to strong winds and heavy rain as #Amphan crossed West Bengal-Bangladesh coast between Digha (West Bengal) and Hatiya Islands (Bangladesh) across Sunderbans, between 1530 and 1730 hrs today. pic.twitter.com/obYlwiW9TO
— ANI (@ANI) May 20, 2020