Dehuroad : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना विमा संरक्षण द्या : भरत नायडू
एमपीसी न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसरात्र कार्यरत असलेल्या शहरी आणि ग्रामीण पत्रकारांना विमा कवच देण्यात यावे, अशी मागणी देहूरोड शिवसेना शहरप्रमुख भरत नायडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत नायडू यांनी मुख्यंमत्री ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोरोना विषाणूची लागण होऊन देशात व राज्यात राज्यात अनेक नागरिकांचे बळी गेले आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.
मात्र, कोरोनाच्या रूग्ण संख्येमध्ये होणारी सततची वाढ आणि त्यावर अद्याप कोणतीही लस उपचार उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये आणि वैद्यकीय क्षेत्रासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. अशा कठीण प्रसंगी राज्यातील विविध प्रसार माध्यमांचे पत्रकार जीवाची जिवाची पर्वा न करता वार्तांकन करीत आहेत. त्यामुळे नागरिकांना घर बसल्या सर्व बातम्या समजत आहेत.
सद्यस्थितीत अनेक प्रसार माध्यमांतील मोठ्या अस्थापनांव्यतिरिक्त इतर आस्थापनांमध्ये तसेच ग्रामीण भागात काम करणाऱ्या पत्रकारांना तुटपुंज्या पगारावर काम करावे लागत आहे. या पत्रकारांना कोणत्याही सुविधांचा लाभ मिळत नाहीत. कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे समाजाच्या हितासाठी सतत धडपडणाऱ्या या पत्रकारांसाठी ५० लाखाचे विमा कवच उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे नायडू यांनी निवेदनात नमूद केले आहे.