Delhi News: संरक्षित प्राण्यांच्या यादीतून ‘बैल’ हा प्राणी वगळा – खासदार डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज – खिलार जातीच्या देशी बैलांचा वंश वाचवण्यासाठी बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून ‘बैल’ हा प्राणी वगळावा अशी मागणी शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडे केली.

बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी बुधवारी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेऊन निवेदन दिले. बैलगाडा शर्यती बंद झाल्यापासून सातत्याने खिलार जातीच्या देशी बैलांची संख्या कमी होत असून 1997 पासून 2018 पर्यंत जवळपास बैलांची संख्या 22 टक्क्यांनी कमी झाली आहे. तर, 2019 ही संख्या 29.63 इतकी कमी झाली असून सोळावी पशुगणना ते 19 वी पशुगणना या काळात 45.67 टक्क्यांनी बैलांची संख्या कमी झाली असल्याकडे केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांचे लक्ष वेधले.

वाघ, सिंह, अस्वल, माकड या संरक्षित जंगली प्राण्यांच्या यादीत पाळीव प्राणी असलेल्या ‘बैल’ प्राण्याचा समावेश झाल्यामुळे देशी खिलार जातीच्या बैलांचा वंश नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी निदर्शनास आणताच गिरीराज सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याचे सांगण्यात आल्याने आपण निर्णय घेतला नाही अशी कबुली दिली.

‘बैल’ प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्यासाठी आपण मांडलेले मुद्दे गिरीराज सिंह यांनी आपुलकीने समजून घेतले. त्याचबरोबर बैलगाडा शर्यती बंद झाल्यामुळे ग्रामीण अर्थकारणावर विपरीत परिणाम झाला असून बारा बलुतेदारांचा व्यवसाय ठप्प झाल्याने व्यापार पूर्णतः थांबला आहे. याकडे आपण गिरीराज सिंह यांचे लक्ष वेधल्याचे सांगून खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, ‘बैल’ हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याबाबत गिरीराज सिंह यांनी सकारात्मकता दर्शवली. तसेच या संदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले असून गुरुवारी ही बैठक होण्याची शक्यता असल्याचे डॉ. कोल्हे म्हणाले. या भेटीत गिरीराज सिंह यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना डॉ. कोल्हे यांनी केलेल्या आक्रमक व मुद्देसूद भाषणाचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.