Delhi News : आता फोन नंबरच्या आगोदर शून्य डायल केल्यावरच लागणार कॉल !
एमपीसी न्यूज : देशभरातील कायमस्वरुपी फोन आणि मोबाईल नंबर डायल करण्यापूर्वी शून्य (Zero) लावल्याशिवाय कॉल लागणार नाही. येत्या 15 जानेवारीपासून ही सेवा अंमलात येणार असल्याची माहिती ट्राय आणि दूरसंचार मंत्रालयाच्या वतीने जाहीर प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
यामध्ये नमूद केल्या प्रमाणे, ट्राय यांच्या शिफारशीनुसार येत्या 15 जानेवारीपासून देशातील सर्व कायमस्वरुपी (Fixed line) फोन नंबर आणि मोबाईल नंबरपूर्वी शून्य लावल्यानंतरच कॉल लागू शकणार आहे. तसेच फिक्स टू फिक्स, मोबाईल टू फिक्स आणि मोबाईल टू मोबाईल प्लॅनमध्ये या सेवेमुळे कुठलीही बाधा किंवा बदल होणार नाही.
तसेच नागरिकांकडून शून्य न लावता कॉल लावल्यानंतर याची सूचना सांगणारी रिंगटोन ऐकू येणार आहे. त्यामुळे दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांना प्रत्येक ग्राहकांच्या नंबरपूर्वी शून्य डायल करण्याची सेवा प्रदान करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
2541 दशलक्ष फोन आणि मोबाईल नंबरच्या पूर्वी शून्य लावावे लागणार आहे. सर्व ग्राहकांना विनाबाधा ही सुविधा देण्याचे आदेश सर्व दुरसंचार सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना देण्यात आले आहेत.