Delhi News : पुणे- चिनाब मैत्रीपर्वाला सुरुवात; चिनाब खोऱ्याला महाराष्ट्राशी जोडण्यासाठी सरहदचे प्रयत्न
एमपीसी न्यूज – चिनाब खोऱ्याला महाराष्ट्राला जोडण्यासाठी सरहदने आणखी एक पाऊल टाकले आहे. या खोऱ्यात वॉर मेमोरियल, शाळा उभारणीसह विविध विकास प्रकल्प सुरू करण्यासाठी नायब राज्यपालांबरोबर सरहदच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. या सकारात्मक चर्चेतून पुणे- चिनाब मैत्रीपर्वाला सुरुवात झाली आहे.
काश्मीरमधील हिंसाचारग्रस्त भागांतील मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या पुण्यातील सरहद आणि अर्हम फाऊंडेशनने जम्मूला महाराष्ट्राबरोबर जोडण्यासाठी पाऊल टाकले आहे. निसर्ग सौंदर्यांची उधळण असलेल्या; परंतु दुर्लक्षित चिनाब खोऱ्यात शिक्षण, पर्यटन विकास आदी उद्दिष्टे या उपक्रमाअंतर्गत ठेवण्यात आली आहेत. सरहदचे संजय सोनवणी, अर्हम फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. शैलेश पगारिया, सरहदचे जम्मूतील संघटक तरुण उप्पल यांनी यासंदर्भात नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेऊन चर्चा केली.
चिनाब खोरे हा दहशतवाद्यांच्या कारवायांच्या झळा सोसलेला प्रदेश आहे. तेथील दोडा येथे वॉर मेमोरियलची उभारणी, तसेच चिनाब खोऱ्यातील दुर्लक्षित आणि अज्ञात सौंदर्य स्थळे जगासमोर आणणे, तेथील शेतीमालास महाराष्ट्रात बाजारपेठ उपलब्ध करून देत स्थानिक शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्रोत मिळवून देणे यांसह विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली. या उपक्रमांसाठी सरकारी परवानगी व अन्य प्रक्रियांसाठी सहकार्य करण्याची विनंती या शिष्टमंडळाने राज्यपालांना केली.
सोनवणी म्हणाले, “सरहदने चिनाबची सौंदर्यस्थळे दाखविणारे कॉफी टेबलबुक तयार केले आहे. यामुळे पर्यटकांचे लक्ष चिनाब खोऱ्याकडे वेधले जात आहे. या खोऱ्यातील हस्तकला उद्योग आणि फळ उत्पादने यांना पुण्यात मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यश मिळते आहे. येथील सरकारच्या मदतीने हे कार्य विस्तारण्यासाठी आम्ही नायब राज्यपालांची भेट घेऊन चर्चा केली आहे.
डॉ. शैलेश पगारिया म्हणाले, ” चिनाब खोऱ्यात शाळा सुरू करून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण दिली जाईल आणि बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी पुणे येथे उच्च शिक्षणाची व्यवस्था केली जाईल. त्यासाठी राज्यपालांची भेट घेतली. त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.”
चिनाब खोऱ्याचे कॉफी टेबल बुक नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना यावेळी भेट देण्यात आले. सरहद आणि अर्हम फाऊंडेशन हे जम्मू-काश्मीरमध्ये करीत असलेल्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. या भागात वॉर मेमोरियल उभारणीसाठी जागा देण्यासाठी प्रयत्न करु, असे ते म्हणाले.