Pune News : कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांचे, रुबाब मात्र सुरक्षारक्षकाचा!
एमपीसी न्यूज – सर्वसामान्य नागरिकांशी उद्धटपणाने वागणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरक्षा कर्मचारी सातपुते यांना तातडीने निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते व महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप नाईक यांनी केली आहे.
या प्रकरणी नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यावर तातडीने कारवाई झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसांपूर्वी कामानिमित्त जाण्याचा प्रसंग आला. सोबत मावळचे उपविभागीय अधिकारी तसेच इतर सन्माननीय देखील होते. कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांना सर्वांनाच भेटता येत नाही. त्यामुळे उपविभागीय अधिकारी आत भेटीसाठी गेले असता बाकी सदस्य बाहेर बसले होते. फोन आल्यामुळे आपण थोडे बाजूला गेलो. त्या वेळेस शासकीय सेवक असलेल्या सातपुते नावाच्या सुरक्षारक्षकाने आपल्याला हटकले. ‘ए, काय करतोस येथे? काय काम आहे? एका जागेवर बसता येत नाही का,’ अशा एकेरी व उर्मट भाषेत जाब विचारला, अशी तक्रार नाईक यांनी केली आहे.
नाईक यांनी या घटनेचा निषेध करीत मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन दिले. या निवेदनात शासकीय कर्मचाऱ्यांचे वर्तन नम्र तसेच सहकार्यपूर्ण असणे अपेक्षित आहे. लोकशाहीत नागरिक हे खरे मालक आहेत. शासकीय सेवकांनी त्यांच्याशी उर्मटपणे वागणे, हा शिस्तभंग मानून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. संबंधित कर्मचाऱ्याबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याची गंभीर दखल शासनाने घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
आपल्या वागणुकीत सुधारणा होत नसेल तर अशा कर्मचाऱ्यांना घरी पाठवा. त्यांना सेवामुक्त करा. त्यांचे लाड पुरवायला ते काही सरकारचे जावई नाहीत, असे नाईक म्हणाले.