Dighi : मूल होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – मूल होत नसल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. तसेच एक वर्षाच्या आत मूल झाले नाही, तर पतीचे दुसरे लग्न करून देणार असल्याची धमकी विवाहितेला दिली. ही घटना मे 2014 ते मे 2019 या कालावधीत खडकी व दिघी येथे घडली.

याप्रकरणी 27 वर्षीय विवाहितेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुरेश सूर्यवंशी (वय 34), कावेरी सूर्यवंशी, भीमराव सूर्यवंशी, रेणुका सूर्यवंशी, महानंदा माने, तुळजाराम माने यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला मूल होत नसल्याच्या कारणावरून आरोपींनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. किरकोळ कारणावरून तिला सतत टोमणे मारून बोलले जात होते. तसेच पती सुरेश याने जागा घेण्यासाठी माहेरुन पैसे आणण्याची मागणी केली. माहेरच्या मंडळींनी पैसे बँक खात्यावर जमा केले.

माहेरच्या लोकांनी रोख रक्कम न देता बँक खात्यावर पैसे पाठवल्यावरून देखील विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली. विवाहितेला एक वर्षाच्या आत मूल झाले नाही, तर पतीचे दुसरे लग्न करून देणार असल्याची धमकी मावस सासरे तुळजाराम यांनी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.