Dighi News: लॉकडाऊन पुन्हा परवडणारे नाही – श्रीरंग बारणे

दिघी शिवसेना शाखेच्या रक्तदान शिबिरात 603 बाटल्या रक्त संकलन

एमपीसी न्यूज – युरोपातील अनेक राष्ट्रांनी पुन्हा लॉकडाऊन केले आहे. परंतू, महाराष्ट्राला आता लॉकडाऊन परवडणारे नाही. त्यासाठी आपण सर्वांनी सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे. मास्कचा वापर करा, सॅनिटायझर वापरा, गर्दीत जाण्याचे टाळा, असे आवाहन शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिघी येथे केले.

शिवसेना शाखा दिघी यांच्या वतीने शुक्रवारी (दि. 25 डिसेंबर) दिघी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्‌घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, माजी जिल्हा प्रमुख राम गावडे, माथाडी मंडळ सल्लागार समिती सदस्य व कामगार नेते इरफान सय्यद, माजी सरपंच साहेबराव वाळके, माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके, आयोजक संतोष वाळके, सारिका वाळके, पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव आदी उपस्थित होते.

सर्व सहभागी रक्तदात्यास हेल्मेट, पाण्याचा जार, हेडफोन भेट या पैकी एक वस्तू भेट देण्यात आली. दिघी शिवसेना आणि वाळके प्रतिष्ठान तसेच लायन्स क्लब ऑफ पुणे डिजिटल व रेड प्लस रक्तपेढीचे सहकार्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 603 जणांनी रक्तदान केले.

खासदार बारणे म्हणाले की, कोरोना जागतिक महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्रात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी टप्प्या-टप्प्याने लॉकडाऊन जाहीर केले. त्यानंतर देशभर लॉकडाऊन केले. आता काही देशात पुन्हा लॉकडाऊन केला जात आहे. महाराष्ट्रात तो परवडणारा नाही. त्यामुळे सर्वांनी नियनांचे पालन करावे.

ज्या समाजात आपण लहानाचे मोठे होतो. त्या समाजाचे आपण देणे लागतो. राज्यात रक्ताचा तूटवडा निर्माण झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरीकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. त्यांचा आदेश शिरसावंद्य मानून शिवसेनेच्या दिघी शाखेकडून रक्तदान शिबिर घेण्यात आले, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.