Pune : तर मला अटक का नाही – दिग्विजय सिंह
एमपीसी न्यूज – ”मी राज्यसभेवर खासदार आणि मध्यप्रदेशचा माजी मुख्यमंत्री असल्याने वेबसाइट वर माझा मोबाईल नंबर आहे. तसेच माझे नक्षलवादा सोबत नाव जोडले गेले. त्यावर अनेक वेळा चर्चा देखील झाली. हे पाहता मी आतंकवादी किंवा दहशतवादी असेल तर मला अटक का केली जात नाही”, असा सवाल मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार दिग्विजयसिंह यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला. शहरी नक्षलवादा बाबत तुमचे नाव पोलीस तपासात पुढे आले होते. त्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली.
यावेळी माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह म्हणाले की, 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्यापूर्वी प्रत्येक वर्षी 2 कोटी तरुणांना रोजगार देणार, देश भ्रष्टाचार मुक्त करणार, शेतकर्यांच्या मालास हमीभाव देणार यासह अनेक आश्वासने देण्यात आली. त्यामधील एक ही आश्वासन पूर्ण करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रश्न सोडविले तर नाहीच. केवळ आपल्याला स्वप्न दाखविण्याचे काम केले असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.
तसेच ते पुढे म्हणाले की, भाजपने 2014 साली 280 च्या पुढे जाणार आणि त्याप्रमाणे झाले. त्यानंतर आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 300 च्या पुढे आमच्या जागा येणार असे भाजपच्या नेत्याकडून सांगण्यात आले. त्यानुसार 303 जागा देखील आल्या. या दोन्ही निवडणुकीतील आकडे अत्यंत खरे ठरले आहे. हे पाहून आश्चर्य वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मी भाजपच्या या अंदाजाचे अभिनंदन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्नाटक येथील काँग्रेस पक्षाचे आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या प्रश्नावर ते म्हणाले की, मागील पाच वर्षात भाजपने भ्रष्टाचाराच्या माध्यमातून खूप पैसा मिळवला आहे. अशा पैशातून आणि चुकीच्या मार्गाने आमदारांना भाजपमध्ये घेतले जात आहे. या प्रकाराचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. तसेच आम्ही सत्तेमध्ये असताना आमच्याकडून अशा प्रकारचे कृत्य झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय कमिटीने अध्यक्षपदाचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा : दिग्विजय सिंह
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागल्याने. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी जबाबदारी स्वीकारत कमिटीकडे राजीनामा सादर केला. त्यावर पक्षातील अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांनी राजीनामा मागे घेण्याबाबत चर्चा केली. पण राहुल गांधी हे राजीनाम्यावर ठाम आहे. आता हे पाहता राष्ट्रीय कमिटीने अध्यक्षपदाबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी दिग्विजयसिंह यांनी केली. राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत अद्यापपर्यंत निर्णय घेतला जात नाही. यावर त्यांनी भूमिका मांडली.