वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हणत एकनाथ खडसेंनी मागितली ब्राह्मण समाजाची माफी!

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना ‘मी मुख्यमंत्रिपद ब्राह्मणाला दान केले,’ असे वक्तव्य केले होते. पुण्यातील ब्राह्मण महासंघाने त्यावरून खडसेंच्या वक्तव्यावर आक्षेप घेत, त्यांनी तातडीने माफी मागावी, अशी मागणी केली होती. त्यावरुन आता ट्विट करुन माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हणत एकनाथ खडसेंनी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे.

या प्रकरणावर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले होते की, फडणवीसांवर टीका करताना एकनाथ खडसेंनी ब्राह्मण समाजाबाबत जे वक्तव्य केले त्यांनी ते मागे घ्यावे, अन्यथा खडसेंचा एकही कार्यक्रम पुण्यात होऊ देणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे पदवीधर निवडणुकीत त्यांच्या वक्तव्याचे परिणाम भोगावे लागतील.

यासंदर्भात पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना निवेदनही दिले असल्यामुळे एकनाथ खडसेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसण्याची शक्यता होती.

खडसे ट्विटमध्ये नेमकं काय म्हणाले….

दि. 6 नोव्हेंबर 2020 रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.