Pimpri : ज्ञानप्रबोधिनी केंद्राने केले पूरग्रस्तांसाठी भरीव मदत कार्य

एमपीसी न्यूज – ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राचे १५० शिक्षक, युवक-युवती, पालक सदस्यांनी सांगली – कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागात १५ दिवस जाऊन मदतकार्य केले. केलेल्या मदतकार्याचे व तेथील विदारक दृष्याचे आलेले अनुभव त्यांनी शनिवारी प्राधिकरणातील ज्ञानप्रबोधिनी शाळेत मांडले.

पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष जाऊन काम करणा-या कार्यकर्त्यांचा अनुभव कथनाचा कार्यक्रम काल शनिवारी दि. ३१ ऑगस्टला पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, केंद्र उपप्रमुख मनोज देवळेकर, व्यवस्थापक यशवंत लिमये, पालक राजश्री ओझर्डे उपस्थित होत्या.

महापूर बाधित भागांची पाहणी करून शिरोळ तालुक्यातील भेंदवडे, भरतवाडी, कणेगाव, कुरुंदवाड, भैरववाडी, अर्जुनवाड, अब्दुलाट, नृसिंहवाडी, खिद्रापूर, राजापूर, दंडवाड, अक्कीवाड, हेरवाड, बसतवाड या गावात काम झाले. १२५ घरांची, २५-३० गल्ल्या, रस्ते – परिसर, २ अंगणवाड्या, ४ शाळा सार्वजनिक वाचनालय, आरोग्य केंद्र  ४ मंदिरे या सर्वांची  स्वच्छता मोहीम व औषध फवारणी करण्यात आली.

बाराशे कुटुंबात तात्काळ गरजेचे वाण-सामान, ५०० अंथरुण-पांघरुण, चटयांचे वाटप केले. सहा शाळांमध्ये स्वच्छता साहित्य देण्यात आले. तसेच ग्रामस्थांनी  संवाद साधत त्यांचे  मनोबल उंचावण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले. शाळेतून तांत्रिक मदत करणा-या सर्व कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

डॉ. निलेश शिर्के, किरण देशमुख, गणेश देव सोन्नर, विवेक केळकर, वृंदा गाडगीळ, माधुरी केदारे, श्रीराम इनामदार यांनी अनुभव सांगितले. कार्यकर्त्यांना संस्थेच्या वतीने अॅड. सचिन पटवर्धन यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली.

अॅड. सचिन पटवर्धन म्हणाले,  तुम्हा सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे अधिक योग्य आहे. ज्ञान प्रबोधिनीचे वेगळेपण आहे की काम करुन इतरांना धडा घालून देणे. हे कार्य निश्चितच स्तुत्य आहे.

मनोज देवळेकर म्हणाले,निसर्ग आपल्याला इशारा देत आहे. या आपत्तीतून आपण शिकले पाहिजे. दीर्घकालीन कामाचे नियोजन करुयात. अशा आपत्तींना रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करता येईल याचा विद्यार्थी अभ्यास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.