Exam News : मोठी बातमी ! नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करणार

शिक्षण विभागाचा निर्णय

एमपीसी न्यूज – पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिल्यानंतर आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. कोरोनाचा कहर वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइनच होणार आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन पुढील दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार आहे.

नववीतील विद्यार्थ्यांच्याही शाळा यंदा ऑनलाइनच झाल्या आहेत. बहुतेक ठिकाणी प्रात्यक्षिके, सत्र परीक्षा, चाचणी परीक्षा झालेल्या नाहीत. अकरावीचे वर्गच नोव्हेंबरनंतर सुरु झाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे, असा पेच शिक्षण विभागासमोर होता. तर दुसरीकडे निर्बंध, कोरोनाचे वाढते रुग्ण यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, रद्द करण्यात याव्यात अशा मागण्या पालक करत होते. मात्र, ठरलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा घेण्याबाबत शिक्षण विभाग ठाम होतं.

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांबाबत काय होणार याबाबत अद्यापही विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचं शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकात थोडासा बदल करायचा की नाही याबाबत येत्या एक-दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.