Pune : मानवादित्यसिंह राठोड, मनिषा कीर सुवर्ण पदकाचे मानकरी  

एमपीसी न्यूज – डळमळीत सुरवातीनंतर संयम आणि अचूकतेवर लक्ष केंद्रित करून राजस्थानच्या मानवादित्यसिंह राठोड याने 21 वर्षांखालील वयोगटात नेमबाजीतील ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक पटकाविले 

याच वयोगटात मुलींच्या विभागात मनिषा कीर हिने सुवर्ण पदक पटकाविले. दोघांसाठी त्यांचे वडिल हेच प्रेरणा स्थान असले, तरी फरक इतकाच की मानवादित्यचे वडिल ऑलिंपिक रौप्यपदक विजेते आणि केंद्रिय क्रीडा राज्यमंत्री आहेत. होय ! क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांचा मानवादित्य मुलगा आहे. त्याचवेळी मनीषाची कौंटुबिक परिस्थिती बेताचीच आहे. वडिलांच्या मासेमारीच्या उद्योगावरच त्यांचे घर चालते. तिला ऑलिंपियन मनशेरसिंगचे मार्गदर्शन लाभते.

पात्रता फेरीत मानवादित्यला लय गवसली नव्हती. आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता लक्ष्य शेरॉन आघाडीवर होता. पण, अंतिम फेरीत त्याला पक्षांचा अचूक वेध घेण्यात अपयश आले आणि याचा फायदा मानवादित्यने अचूक उठवला. संयम आमि अचूकतेवर भर देत त्याने आपले वर्चस्व निर्माण केले. शार्दुल नंतर लय गमावून बसला आणि भोवनशी मेंदिरत्ती, शार्दुल विहान पाठोपाठ चौथ्या स्थानावर राहिला.

अर्थात, अंतिम फेरीतही त्याची सुरवात डळमळीत झाली होती. पहिल्या दहा संधीत त्याला केवळ पाचच शॉटमध्ये यश आले होते. पण, दुसऱ्या टप्प्यात शेरॉन अपयशी ठरत असताना मानवादित्यने नऊ शॉट अचूक घेत मुसंडी मारली. त्यामुळे तो तिसऱ्या स्थानावर आला होता. त्यानंतर मात्र त्याने मागे वळून बघितले नाही. मानवादित्य म्हणाला,””जेव्हा संघर्ष सुरु होतो तेव्हा तुमच्यासमोर दोनच पर्याय असतात. एक तर तुम्ही हार मानायची नाही तर झुंजायचे. माझ्या वडिलांकडून मला ही शिकवण मिळाली. त्याचा येथे मला फायदा झाला. प्रतिस्पर्धी चुकतील याची मी वाट पाहिली आणि संधी साधण्यासाठी संयम ठेवला. त्यामुळे मला यश मिळू शकले.”

भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळविण्याचे आपले उद्दिष्ट असून, त्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचेही मानवादित्यने सांगितले. तो म्हणाला,””अंतिम टप्प्यातही माझ्याकडून दोनवेळा चुका झाल्या. पण, अखेरच्या क्षणापर्यंत थांबायचे ठरवले. चुकांतून बोध घेत त्या पुन्हा होणार नाहीत याकडे मी लक्ष दिले. वरिष्ठ संघात स्थान मिळविण्याचे माझे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ही स्पर्धा माझ्यासाठी शिकण्याची संधी होती. स्पर्धा केंद्राजवळूनच हमरस्ता जात असल्याने वाहनांचा आवाज येत होता. एकाग्रता राखण्याचे आव्हान होते. त्यामुळे एकवेळ मी कानात इयररिंग्ज घालून गाणी ऐकण्यास सुरवात केली. त्याचाही मला फायदा झाला.”

अंतिम फेरीत दडपण होते का असे विचारले असता 19 वर्षीय मानवादित्य म्हणाला,””प्रत्येक स्पर्धेत दडपण असते. पण, सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी हेच दडपण प्रेरित करते. अधिक विचार करायचे सोडून कामगिरीवर लक्ष केंद्रित करायचे ही वडिल आणि आईने मला दिलेली शिकवण मोलाची ठरली.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.