Pimpri : मंदीतून बाहेर काढण्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावेत – काशिनाथ नखाते
एमपीसी न्यूज – भारतात ठराविक कालांतराने वाहन उद्योग व तत्सम उद्योगात मंदी येत असते मात्र सध्या आलेली मंदी तीव्र आणि प्रकर्षाने जाणवत आहे. त्याची झळ पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्राला पोहोचत आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न करावेत अशी अपेक्षा कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केली.
कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे विस्थापित कामगार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी अनिल जाधव, भास्कर राठोड, तुषार कदम, अनिल बारावकर, बालाजी इंगळे, जिवन भोसले, अंजना गायकवाड, सुधा भोसले, रंजना जंगले, भारती बेडगे, आशा राठोड, वैजयंती पवार आदी उपस्थित होते.
नखाते पुढे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड नगरी ही ख-या अर्थाने औद्योगिक आणी कामगार नगरी म्हणून ओळखली जाते. मात्र, काही वर्षांपासून इथली ओळख बदलत आहे. कामगारांच्या हातचे काम गेले, काम आज आहे तर उद्या नाही अशी अवस्था आहे. येथील कंपन्यांचे स्थलांतर होत असून जागेला आलेले सोन्या- हि-याचे भाव यास कारणीभूत आहे. आय टू आर करून कंपन्या विकून कारखाने स्थलांतरीत होत असल्यामूळे शहरातील संघटीत आणी असंघटीत कामगार आज शेवटच्या घटका मोजत आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून बेरोजगारी हा मोठा धोका निर्माण झाला आहे.
वास्तविक सनासुदीच्या काळात कंपन्यांमधील यंत्रे ही अधिक जोमाने चालायची. मात्र, शहरातील अनेक कंपन्या काही दिवसांसाठी बंद केल्या असून दिवाळीचे बोनस तर सोडा मात्र रोजीरोटीचाच प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे स्थलांतरीत कामगारांना इकडे आड अन तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे.
कंपन्या आणि इतर उत्पाद्क म्हणजे धातू, इंधन,प्लास्टिक, रबर, पेंट, काच, टायर यांच्यासह एकमेंकावर अवलंबून असणारे अनेक घटक कंपन्या राज्यात आहेत. त्यामूळे सर्वच व्यवसायात मंदी जाणवत असून मंदीतून बाहेर काढण्यासाठी वाहन उद्योगात सर्वांगीण भवितव्यासाठी सर्वंकष धोरण आखणे गरजेचे आहे. केंद्र व राज्य सरकारची जबाबदारी असून ती पूर्ण करावी. वाहन उद्योगातील वाढती स्पर्धा डिझेल ऐवजी सीएनजी अथवा बैटरीवरील वाहनांचा पर्याय होऊ शकतो. मात्र, त्यासाठी नियोजन होणे गरजेचे आहे.