Gram Panchayat Election : गाव कारभाऱ्यांनो, जय-पराजय विसरुन ग्रामविकासासाठी एकत्र या – उपमुख्यमंत्री

एमपीसी न्यूज – राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. निवडणूकीत अनेक ठिकाणी काटे की टक्कर बघायला मिळाली. या निवडणुकीतील सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. गावकारभाऱ्यांनो, आता मिळालेल्या संधीचे सोनं करा, जय-पराजय विसरून ग्रामविकासासाठी एकत्र या! असे, आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

अजित पवार म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीचा पाया भक्कम करणारी आणि महात्मा गांधीजींचे ग्रामविकासाचे स्वप्न सत्यात आणणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेतील ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक आहे. या ग्रामविकासाच्या प्रक्रियेत काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. गावाचा विकास करण्यासाठी लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी आता आणखी वाढली आहे.

पवार आपल्या संदेशात पुढे म्हणातात, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी दाखविलेल्या विकासाच्या मार्गावर आपल्या गावाला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावं. जनतेचा विश्वास सार्थ ठरवत ग्रामविकासाचा आदर्श निर्माण करावा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.