Pimpri : अटलजींना काव्यांजली समर्पित
एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रथम मासिक पुण्यस्मरणानिमित्त काव्यांजली कविसंमेलन मोरवाडी येथील भाजपा कार्यालयात घेण्यात आले. अटलजी यांनी लिहिलेल्या कवितांचे अभिवाचन शहरातील कविंनी केले.
यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, पिंपरीचिंचवड महानगरपालिकेचे पक्षनेते एकनाथ पवार, आर एस कुमार यांनी अटलजी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून कविता अभिवाचनाची सुरुवात केली. कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी सुरेश कंक होते. तर प्रमुख पाहुणे भाजपा दक्षिण भारतीय आघाडीचे प्रदेश अध्यक्ष राजेश पिल्ले होते.
“मौतसे ठन गयी, जुझनेका मेरा इरादा न था” ही अटलजीची कविता उज्वला केळकर यांनी वाचन केली. “अगणित बलिदानोसे अर्जित ये स्वतंत्रता” ही कविता राज अहेरराव यांनी सादर केली. “हरी हरी दुबपर ओस की बुंदे अभी थी अभी नही थी” या अटलजींच्या कवितेचे वाचन मधूश्री ओव्हाळ यानी केले. “भारत जमीन का तुकडा नही जीता जागता राष्ट्रपुरुष है” ही कविता सुहास घुमरे यांनी सादर केली. अटलजींच्या कवितेचा स्वैर मराठी अनुवाद मानसी चिटणीस यांनी सादर केला.
काव्यांजली कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश कंक यावेळी म्हणाले, अटलजींच्या कवितांना देशभक्तीचा घुमार होता. कधी त्यांची कविता पवित्र गंगेसारखी निर्मल मधुर असायची तर कधी पोखरणच्या अणूस्फोटाप्रमाणे स्फोटक असायची. जगाच्या साहित्य इतिहासात त्यांच्या कवितांची नोंद कायम राहीन.
कवी राजेंद्र घावटे,शोभा जोशी, अंतरा देशपांडे,शरद शेजवळ,विनिता माने यांनी अटलजींच्या कवितांचे अभिवाचन केले. सूत्रसंचलन भारतीय जनता पक्षाचे कार्यालय सचिव रामकृष्ण राणे यांनी केले. तर आभार शीतल शिंदे यांनी मानले.