Pune : राजनेता व कवी असा अव्दितीय संगम असलेला नेता हरपला – प्रतिभा पाटील
एमपीसी न्यूज : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे, वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, मागील 48 तासांत त्यांची प्रकृती जास्त खालावली होती.
राजनेता आणि कवी असा एक अतिशय सुंदर संगम अटलबिहारी वाजपेयी यांच्यामध्ये होता. ते नेहमी प्रत्येकाशी आदराने आणि प्रेमाने वागायचे. देशाविषयी प्रेम त्यांच्यात ओसंडून वाहत होते. भारत-पाकिस्तान यांचे संबंध सुधारावेत यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना जर यश आले असते तर आज देशाचा खूप मोठा फायदा झाला असता. असा मनमोकळ्या स्वभावाचा नेता आज आपल्यातून निघून गेला आहे. अश्या शब्दात देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी वाजपेयी यांना आदरांजली अर्पण केली आहे.
देशाच्या राजकारण एक मितभाषी आणि कणखर नेतृत्व म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांना ओळखलं जातं. कारगिलची लढाई असो की भारताला अणुअस्त्रधारी देश बनवण्याच्या निर्णय, त्यांनी आंतरराष्ट्रीय विरोध झुगारत देशहिताचे असंख्य निर्णय घेतले होते.