हिंदी चित्रपट ‘स्त्री’…. एक भयपट….

(दीनानाथ घारपुरे)

एमपीसी न्यूज- भीती… माणसाला वाटणारी भीती, एक संवेदना, भीती आपल्याला वाटत असली तरी त्या भीतीचा आनंद आपण घेत असतोच. भीतीचे प्रकार सुद्धा विविध आहेत त्या मधील महत्वाचा मुख्य म्हणजे नेहमीचा प्रचलित असलेला प्रकार म्हणजे ” भुतांचा ” प्रकार,,, अनोळखी रस्त्यावरून – जंगलातून रात्रीच्यावेळी जाताना त्या भयाण शांततेत कुठेतरी सळसळ ऐकू आली कि दचकायला होते, कोणाचा अनोळखी व्यक्तीची हाक आपल्याकानी पडली तर मग जी अवस्था होते त्याचे काय वर्णन करावे…. असो — अश्याच मध्यवर्ती कल्पनेवर आधारित ” स्त्री ” ह्या चित्रपटाची निर्मिती मोडॉक फिल्म्स तर्फे निर्माते दिनेश विजन, राज, आणि डी. के. यांनी केली असून त्याचे दिगदर्शन अमर कौशिक यांनी केलं आहे. संवाद सुमित अरोरा यांचे असून छायाचित्रण अमलेंदू चौधरी यांचे आहे, संगीत सचिन-जिगर यांचे आहे, यामध्ये राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी, अतुल श्रीवास्तव ह्या कलाकारांनी भूमिका केल्या आहेत.

मध्य प्रदेश मधील चंदेरी गावात हि कथा घडते. या गावातील प्रत्येक घरावर ” ओ स्त्री कल आना ” असे लिहिलेलं असते, कारण त्या गावावर एका ” स्त्री ” भुताची छाया पडलेली असते, ती ” स्त्री ” मध्यरात्री गावात फिरते आणि एकट्यादुकट्या पुरुषाला उचलून घेऊन जाते, त्यानंतर त्या पुरुषाचे फक्त कपडेच सापडतात. त्याच गावात विकी { राजकुमार राव } नावाचा एक कपडे शिवणारा तरुण मुलगा राहत असतो, त्याच्या कपडे शिवण्याची प्रसिद्धी संपूर्ण गावात आणि इतर गावात पसरलेली असते. गावात चार दिवस पूजा / महोत्सव असतो त्यादिवशी गावकऱ्यांच्या बरोबर विकी आणि त्याचे मित्र बिट्टू { अपारशक्ती खुराना }, आणि जना { अभिषेक बॅनर्जी }, तेथे पोहोचतात, त्याचवेळी विकीला एक तरुण मुलगी { श्रद्धा कपूर } मंदिराच्या बाहेर भेटते, आणि काही विचित्र वस्तूंची मागणी करते, पण ती तरुणी मंदिरात काही जात नाही. हे सारे विकी आपल्या मित्राना सांगतो, त्यामुळे त्या तरुणी विषयी शंका निर्माण होते, त्याचवेळी ती ” स्त्री ” जनाला पळवून नेते, कथानक अधिक भयावह होण्यास सुरवात होते, गावातील एक प्रसिद्ध व्यक्ती रुद्र { पंकज त्रिपाठी } ह्याला गावाचा इतिहास माहित असतो, त्यांच्या मदतीने विकी आणि बिट्टू त्या स्त्री चा शोध घ्यायला गावाच्या जवळ असलेल्या एका भयाण हवेलीत रात्री प्रवेश करतात आणि पुढे काय सर्वच भयावह, भीतीदायक आणि अद्भुत, ती स्त्री गावात का येते त्याचे उत्तरही सिनेमात सापडेल तुम्हीच अनुभव घ्या ,,,,,

राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी, अतुल श्रीवास्तव या सर्वच कलाकारांनी आपल्या व्यक्तिरेखा सहजतेने साकारल्या आहेत. अमर कौशिक यांच्या दिगदर्शनाने नटलेला हा भयपट गतिमान ठेवण्यात यशस्वी झाला आहे त्याला विनोदाची झालर दिलेली असल्यानं हलका-फुलका भयपट असे म्हणायला हरकत नाही. पार्श्वसंगीत आणि छायाचित्रण परिणाम साधून जाते. गाणी काही विशेष नाहीत. एकंदरीत एक चांगला भयपट बनवला आहे…

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.