भारताची भावात्मक एकता व विविधतेच्या सन्मानाच्या मुळात हिंदू संस्कृती :  डॉ.मोहन भागवत

राष्ट्रीय एकात्मतेविरुद्ध सक्रिय फुटीरतावादी शक्तींना पराजित करा

एमपीसी न्यूज : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी विजयादशमी उत्सवाच्या (रविवार, दि.२५ ऑक्टोबर २०२०) मुहूर्तावर आपल्या उद्बोधनात आज म्हटले की, शासन-प्रशासन व समाजातील सर्वच घटकांनी मिळून कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना केला. त्यामुळे “जगातील इतर देशांच्या तुलनेत आपला भारत संकटाच्या या परिस्थितीत जास्त चांगल्या पद्धतीने उभा राहिलेला दिसून येतो.

सरसंघचालक म्हणाले, कोरोनाच्या प्रतिक्रियेच्या रुपात जगभरात जागृत झालेल्या ‘स्व’चे महत्त्व, पर्यावरण संरक्षण व संवर्धन, राष्ट्रीयत्व व इतर सांस्कृतिक मूल्यांचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी कुटुंब हे महत्त्वपूर्ण घटक आहे. “आपल्या छोट्या छोट्या वागणूकीच्या बाबींमध्ये परिवर्तन आणण्याचा क्रम बनवून, नियमितपणे या सर्व विषयांच्या प्रबोधनाचे उपक्रम चालवून, आपण आपल्या सवयींमधील या परिवर्तनाला कायम ठेवून पुढे जाऊ शकतो. प्रत्येक कुटुंब याचा घटक बनू शकते”. त्यांनी म्हटले की सौहार्दाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी स्वतःची एक मोठी ओळख ‘हिंदुत्व’ स्वीकार केले पाहिजे.

स्वदेशी व स्वावलंबनाच्या आवश्यकतेवर जोर देत ते म्हणाले, “स्वदेशी केवळ सामान व सेवेपर्यंत मर्यादित नाही. याचा अर्थ राष्ट्रीय आत्मनिर्भरता, राष्ट्रीय सार्वभौमत्व तसेच समानतेच्या आधारावर आंतरराष्ट्रीय सहकार्याची स्थिती प्राप्त करणे आहे…स्वावलंबनामध्ये ‘स्व’चे अवलंबन अपेक्षित आहे. स्व या आत्मतत्वाचा विचार या व्यापक दृष्टीकोनातून सर्वांना आत्मसात करावा लागेल, तेव्हाच योग्य दिशेने जाऊन हा प्रवास यशस्वी होईल.”

कोरोनासंदर्भात भारतीय समाज व शासनाच्या प्रतिक्रियेबाबत ते म्हणाले, “आपल्या समाजाची एकरुपतेचा, सहज करुणा व शील प्रवृत्तीचा, संकटात एकमेकांना सहकार्य करण्याच्या संस्कारांचा, ज्या सर्व गोष्टींना इंग्रजीत ‘सोशल कॅपिटल’ असे म्हटले जाते अशा आपल्या सांस्कृतिक संचित सत्वाचा या संकटकाळात आपल्या सर्वांना सुखद परिचय झाला.”

सरसंघचालकांनी आरोग्य कर्मचारी, प्रशासनातील कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांचे कौतुक करत म्हटले, “प्रशासनाचे कर्मचारी, विविध उपचारपद्धतींचे वैद्यकीय तज्ज्ञ तसेच सुरक्षा व स्वच्छतेसह सर्व कामांत सहभागी होणारे कर्मचारी सर्वोच्च कर्तव्यभावनेसह रुग्णांच्या सेवेत समर्पित होते. स्वतःला कोरोनाच्या विषाणूची बाधा होण्याचा धोका पत्करत त्यांनी दिवसरात्र आपल्या कुटुंबापासून दूर राहून युद्धपातळीवर सेवेचे कार्य केले. नागरिकांनीदेखील आपल्या समाजातील बांधवांच्या सेवेसाठी स्वयंस्फूर्तीने जी वेळेची आवश्यकता होती, त्याला पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची कमतरता होऊ दिली नाही.”

यासंदर्भात भविष्यातील आव्हानांची चर्चा करताना त्यांनी म्हटले, “या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी आता दुसऱ्या प्रकारच्या सेवांची आवश्यकता आहे…कोरोनामुळे ज्या शाळा-महाविद्यालयांना शुल्क मिळाले नाही, त्या महाविद्यालयांजवळ वेतन देण्यासाठी निधी नाही. ज्या पालकांकडे काम बंद पडल्यामुळे मुलांचे शाळा-महाविद्यालयाचे शुल्क भरण्यासाठी निधी नाही, ते लोक समस्येमध्ये अडकले आहेत. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांची सुरुवात, शिक्षकांचे वेतन तसेच मुलांच्या शिक्षणासाठी काही सेवा सहकार्य करावे लागेल. स्थलांतरामुळे रोजगार गेला, नवीन क्षेत्रात रोजगार मिळवायचा आहे, नवीन रोजगार मिळवायचा आहे त्याचे प्रशिक्षण पाहिजे, ही स्थलांतरितांची समस्या आहे. त्यामुळे रोजगाराचे प्रशिक्षण व रोजगाराचे निर्माण हे कार्य करावे लागेल. सर्व परिस्थितीमुळे कुटुंबांमध्ये व समाजात तणाव वाढण्याची स्थिती उत्पन्न होते. अशा स्थितीत अपराध, औदासिन्य, आत्महत्या इत्यादी वाईट प्रवृत्ती वाढू नयेत यासाठी समुपदेशनाची व्यापक आवश्यकता आहे.”

या परिस्थितीमध्ये संघाच्या स्वयंसेवकांच्या भूमिकेबाबत चर्चा करताना त्यांनी म्हटले, “ संघाचे स्वयंसेवक तर मार्च महिन्यापासूनच या संकटासंदर्भात समाजामध्ये आवश्यक सर्व प्रकारच्या सेवेचा पुरवठा करण्याच्या कामात लागले आहेत. सेवेच्या नवीन टप्प्यातदेखील ते पूर्ण ताकदीने सक्रिय राहतील.”

यावेळी मागील वर्षातील काही महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करताना ते म्हणाले, “मागील मार्च महिन्यापासून देश तसेच जगात घडणाऱ्या सर्व घटनांना कोरोना महामारीच्या प्रभावाच्या चर्चेने अक्षरशः झाकोळले आहे. मागील विजयादशमीपासून ते आतापर्यंत सरलेल्या काळात चर्चेयोग्य घटनांची संख्या कमी नाही. संसदीय प्रक्रियेची अंलमबजावणी करत कलम ३७० ला प्रभावहीन करण्याचा निर्णय तर विजयादशमीच्या अगोदरच झाला होता. दिवाळीनंतर ९ नोव्हेंबर रोजी श्रीरामजन्मभूमीच्या प्रकरणात आपला स्पष्ट निर्णय देऊन सर्वोच्च न्यायालयाने इतिहास रचला. भारतीय जनतेने या निर्णयाचा संयम व समजूतदारपणाचा परिचय देत स्वीकार केला. मंदिर निर्माणाची सुरुवात करणारे भूमीपूजन ५ ऑगस्ट रोजी पार पडले. त्यावेळी अयोध्यातील समारंभ स्थळी झालेला कार्यक्रम तसेच देशभरात त्यादिवशीच्या वातावरणातील सात्विकता, संयमितपणासह झालेला हर्षोल्हास, पवित्र व सौहार्दता वातावरणातूनच लक्षात आले.

देशाच्या संसदेत नागरिकता अधिनियम संशोधन कायदा पूर्ण प्रक्रियेचे पालन करत संमत करण्यात आला. काही शेजारी देशांमधील सांप्रदायिक कारणांमुळे छळवणूक झाल्यानंतर विस्थापित होणारे बांधव, जे भारतात येतील, त्यांना माणुसकीचे हित म्हणून त्वरित नागरिकता प्रदान करणारी ही तरतूद होती. त्या देशांमध्ये सांप्रदायिक छळवणूकीचा इतिहास राहिला आहे. भारताच्या या नागरिकता अधिनियम संशोधन कायद्यात कुठल्याही विशिष्ट संप्रदाय किंवा धर्माचा विरोध नाही. भारतात विदेशातून येणाऱ्या इतर सर्व व्यक्तींना नागरिकता देण्यासाठी कायदेशीर तरतूदी, ज्या अगोदरपासूनच अस्तित्वात होत्या, त्यांना यथास्थिती ठेवण्यात आले होते. मात्र कायद्याला विरोध करु इच्छिणाऱ्या लोकांनी आपल्या देशातील मुस्लिम बांधवांच्या मनात, त्यांची भारतातील संख्या मर्यादित करण्यासाठी ही तरतूद आहे असे सांगण्यावर भर दिला. यामुळे विरोध प्रदर्शन वगैरे झाले, त्यात अशा प्रकरणांचा फायदा घेऊन हिंसात्मक तसेच प्रक्षोभक पद्धतीने उपद्रव निर्माण करणाऱ्या तत्वांचा शिरकाव झाला. देशातील वातावरण तणावग्रस्त झाले तसचे मनांमधील सांप्रदायिक सौहार्दावर संकट येऊ लागले. यातून सावरण्यासाठी उपायांवरील विचार पूर्ण होण्याअगोदरच कोरोनाची स्थिती निर्माण झाली आणि माध्यमे तसेच जनतेच्या चर्चांमधील या सर्व बाबी लुप्त झाल्या. उपद्रवी घटनांकडून या बाबी उभ्या करुन द्वेष व हिंसा पसरविण्याचे पाठीमागे षडयंत्र सुरू आहे.”

चीन तसेच भारताच्या इतर शेजारी राष्ट्रांसोबतच्या भारताच्या संबंधांबाबत सरसंघचालक म्हणाले, “ या महामारीसंदर्भात चीनची भूमिका संशयास्पद राहिली हे तर म्हटलेच जाऊ शकते, मात्र स्वतःच्या आर्थिक, सामरिक बळामुळे उन्मत्त होऊन भारताच्या सीमांवर ज्या पद्धतीने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तो संपूर्ण जगासमोर स्पष्ट झाला आहे. भारताचे शासन, प्रशासन, सैन्य तसेच जनतेने या आक्रमणासमोर उभे राहून आपला स्वाभिमान, दृढनिश्चय व शौर्याचा उज्वल परियच दिला आहे. यामुळे चीनला अनपेक्षित धक्का मिळाल्याचे वाटत आहे. या परिस्थितीत आपल्याला सावध होऊन दृढ व्हावे लागेल. चीनने याअगोदरदेखील वेळोवेळी जगाला आपल्या विस्तारवादी मनोवृत्तीची ओळख दिली आहे. आर्थिक क्षेत्रात, सामरिक क्षेत्रात, आपली अंतर्गत सुरक्षा तसेच सीमा सुरक्षा व्यवस्थांमध्ये, शेजारी देशांसोबत तसेच आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये चीनहून मोठे स्थान प्राप्त करणे हाच त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षेवर नियंत्रणाचा एकमेव उपाय आहे. या दिशेने आपल्या सत्ताधाऱ्यांच्या धोरणांची पावलेदेखील पडत आहेत, असे दिसून येते. श्रीलंका, बांगलादेश, ब्रह्मदेश, नेपाळ हे आपले शेजारी देश, जे आपले मित्रदेखील आहेत व मोठ्या प्रमाणात समान प्रकृतीचे देश आहेत, त्यांच्यासोबत आपल्याला आणखी मित्रत्वाचे संबंध करण्याबाबत वेग वाढविला पाहिजे. या कार्यात अडथळे उत्पन करणारे मतभेत, मतांतरे, वाद इत्यादी मुद्दे त्वरित दूर करण्याचे आणखी प्रयत्न करावे लागतील.”

फूट पाडणाऱ्या तत्वांबाबत समाजाला सावध करत ते म्हणाले, “शासन-प्रशासनाच्या कुठल्या निर्णयावर किंवा समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांवर प्रतिक्रिया देताना किंवा स्वतःचा विरोध दर्शवित असताना, आपली कृती ही राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव व सन्मान ठेवून, समाजातील सर्व पंथ, प्रांत, जाती, भाषा इत्यादी विविधतांचा सन्मान ठेवून व संविधान-कायद्याच्या मर्यादेच्या आतच अभिव्यक्त व्हावी हे आवश्यक आहे. दुर्दैवाने आपल्या देशात या गोष्टींवर प्रामाणिक निष्ठा न ठेवणारे किंवा या मूल्यांचा विरोध करणारे लोक, स्वतःला प्रजासत्ताक, संविधान, कायदा, पंथनिरपेक्षता इत्यादी मूल्यांचे सर्वात मोठे संरक्षक सांगून समाजाला संभ्रमित करण्याचे कार्य करत आले आहेत. २५ नोव्हेंबर १९४९ रोजीच्या संविधान सभेमध्ये देण्यात आलेल्या आपल्या भाषणात श्रद्धेय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अशा पद्धतींना “अराजकतेचे व्याकरण” (Grammer of Anarchy) असे म्हटले होते. अशा उपद्रव करणाऱ्या ढोंगी लोकांना ओळखणे व त्यांच्या षडयंत्रांना अयशस्वी करणे तसेच संभ्रमातून त्यांची साथ देण्यापासून वाचणे हे समाजाला शिकावे लागेल.”

त्यांनी म्हटले की फुटीरतावादी व समाजाला तोडण्याचा प्रयत्न करत असलेले तत्व जाणुनबुजून ‘हिंदुत्वाला ‘ आपल्या तिरस्कार व टीकेचा पहिला निशाणा बनवितात. हिंदू कोणताही पंथ, संप्रदाय याचे नाव नाही, कुठल्याही एका प्रांताचा स्वतःचा रोवलेला शब्द नाही, कुठल्याही एका जातीचा वारसा नाही, कुठल्याही एका भाषेचाच पुरस्कार करणारा शब्द नाही आहे. या सर्व विशिष्ट ओळख कायम स्वीकृत तसेच सन्मानित ठेवत, भारत भक्ती तसेच माणुसकीच्या संस्कृतीतील विशाल प्रांगणात सर्वांना स्थायिक करणारा, सर्वांना जोडणारा शब्द आहे. या शब्दावर कुणालाही आक्षेप असू शकतो. आशय सारखा असेल तर इतर शब्दांच्या उपयोगावर आम्हाला कुठलाही आक्षेप नाही.”

ते म्हणाले, “’भारत तेरे टुकडे होंगे ‘ अशा घोषणा देणारे लोक या कारस्थानी मंडळींमध्ये सहभागी आहेत, नेतृत्वदेखील करतात. राजकीय स्वार्थ, कट्टरता व फुटीरतेची भावना, भारताप्रति शत्रुत्व तसेच जागतिक वर्चस्वाची महत्वाकांक्षा, यांचे एक अजबच मिश्रण भारताच्या एकात्मतेविरोधात काम करत आहे. हे समजून संयमाने काम करावे लागेल. भडकविणाऱ्यांच्या बोलण्यात न येता, संविधान व कायद्याचे पालन करत अहिंसक पद्धतीने व जोडण्याच्या एकमेव उद्देशाने आपल्या सर्वांना कार्यरत रहावे लागेल”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.