Hinjawadi Crime : भांडणाची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जाताना दोघांना अडवून बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – भांडणाची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जात असताना सात जणांच्या टोळक्याने रस्त्यात अडवून दोघांना लाथाबुक्क्यांनी आणि स्टंपने मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी साडेआठ वाजता जयराम नगर, हिंजवडी येथे घडली.

तपन अधीर बिसवास (वय 31, रा. हिंजवडी गावठाण. मूळ रा. पश्चिम बंगाल) यांनी याबाबत गुरुवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अमर अविनाथ आरे, मुकेश (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), रणजित उत्तम शेरे आणि त्याचे तीन ते चार चार साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे झालेल्या भांडणाची तक्रार देण्यासाठी फिर्यादी तपन आणि त्यांचा मित्र सागर कविराज बिस्वजित सरकार हे दोघेजण हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात होते. ते जयराम नगर येथील अशोक हॉटेल समोर आले असता आरोपींनी त्यांना अडवले. ‘तुम्हाला लय मस्ती आली आहे का, तुमचा माज उतरवतो’ असे म्हणून शिवीगाळ करत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी अमर याने त्याच्या हातातील स्टंपने मारले. त्यानंतर सागर याला मारण्यासाठी जबरदस्तीने दुचाकीवर बसवून घेऊन जाऊ लागले. दरम्यान तिथे पोलीस आले. पोलिसांना पाहून आरोपींनी सागर याला तिथेच सोडले आणि दुचाकी घेऊन पळून गेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.