Hinjawadi : अपहरण झालेल्या तरुणाची 24 तासांत सुटका; अपहरणकर्ते फरार

एमपीसी न्यूज – अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणाचे अज्ञातांनी अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी तरुणाच्या वडिलांकडे 20 लाख रुपयांची मागणी केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून तरुणाची 24 तासात सुखरूप सुटका केली. अपहरणकर्ते मात्र पोलिसांच्या हाती लागले नाहीत. अपहरणाची घटना बुधवारी (दि. 13) रात्री साडेअकराच्या सुमारास वारजे माळवाडी येथे घडली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तरुणाची गुरुवारी रात्री मुळशी धरण परिसरातून सुटका केली.

वरद शैलेश चिने (वय 21, रा. बावधन) असे अपहरण आणि सुटका झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शैलेश चिने (वय 51) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरद अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. शिक्षण घेत असताना तो नोकरी देखील करत आहे. बुधवारी रात्री साडेअकरा वाजता वारजे माळवाडी येथून अज्ञातांनी त्याचे अपहरण केले. बराच वेळ झाला तरी वरद घरी आला नसल्याने त्याचे पालक काळजी करीत होते. दरम्यान, मध्यरात्री सव्वाएक वाजता वरदच्या वडिलांना वरदच्या मोबाईल वरून अपहरणकर्त्यांनी फोन केला. फोनवर त्यांनी 20 लाख रुपये देण्याची मागणी केली. पैसे दिले नाही तर मुलाला मारण्याची धमकी आरोपींनी फोनवर दिली. तसेच पैसे कुठे द्यायचे याबाबत गुरुवारी सकाळी अकरा वाजता फोन करून सांगतो, असे सांगितले. घाबरलेल्या शैलेश यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

पिंपरी-चिंचवड पोलिसांना माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांसह खंडणी दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा अशा सर्व पोलीस यंत्रणा कामाला लागल्या. पोलिसांनी शिताफीने तपास करत वरद याची गुरुवारी रात्री मुळशी धरण परिसरातून सुखरूप सुटका केली. दरम्यान, वरदच्या अपहरणाची माहिती पोलिसांना मिळाली असल्याचे अपहरणकर्त्यांना समजले. त्यामुळे त्यांनी वरदला मुळशी धरणाजवळ उघड्या परिसरात सोडून तिथून पळ काढला. आरोपी पोलिसांच्या हाती लागले नसून पोलीस यंत्रणा आरोपींच्या मागावर आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.