CM Uddhav Thackeray : मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे – उद्धव ठाकरे
एमपीसी न्यूज – राज्यात शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड पुकारला आणि राज्यसरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उमटवत एकच कोलाहल सुरू झाला. राज्य सरकार कोसळणार अशा चर्चा माध्यमांनी रंगवल्या, तर सोशल मिडीयावर राज्यकर्ते आणि सामान्यांनी या घटनेवर आपापल्या परीने व्यक्त होण्यास सुरूवात केली. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्ह करत या चर्चांना विराम देत त्यांची भूमिका जनतेसमोर स्पष्ट केली. दरम्यान, “जर गरज असेल तर मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे”, असे म्हणून बंड करणाऱ्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी चांगलेच सुनावले.
फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले, मला दुःख झाले. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर काय बोलावं… सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा समोर सांगावं….तुम्ही नालायक आहात, तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको, असं तोंडावर सांगावं. ज्यांना मी नकोय, त्यांनी समोर येऊन सांगावं.. आजच मुख्यमंत्रीपद सोडतो, राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवलं आहे, असे उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना निक्षून सांगितले.
दरम्यान, जनतेचे आभार मानताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आयुष्याची कमाई पद नाहीत. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो. कुटुंब प्रमुख म्हणून मला अनेकांनी सांगितले. ही माझी कमाई आहे, माझे हे नाटक नाही. माझ्यासाठी संख्या विषय गौण आहे. संख्या कशी जमवता हे सुद्धा नगण्य. मी ज्यांना आपला मानतो त्यांनी मला सांगावं मी मुख्यमंत्री पद सोडतो, पक्षप्रमुख पद सोडतो. एकच सांगतो तुमचे प्रेम असेच ठेवा, असे म्हणून त्यांनी जनतेला यावेळी भावनिक साद घातली.